पालघर जिल्ह्यात रविवारी ठिकठिकाणी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. स्थानिक तसेच पोलीस प्रशासनाने उत्तम व्यवस्था राखल्यामुळे विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. दुपारी २ नंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढल्या. त्यामुळे वाहतूककोंडी तसेच विसर्जनाच्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या नाहीत. शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जनाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. विविध संस्थांचे स्वयंसेवक, महानगरपालिकेचे कर्मचारी व पोलीस यांच्यामध्ये उत्तम समन्वय राहिल्यामुळे विसर्जनाचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. गेले ११ दिवस भक्तांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या गणेशाला ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषामध्ये निरोप देण्यात आला.- आणखी वृत्त, छायाचित्रे / ४कडा पाणावल्यावसई : वसई-विरारकर भाविकांनी रविवारी जड अंत:कर्णाने बाप्पाला निरोप दिला. दुपारनंतर गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. अनेक तलावांवर महानगरपालिकेने वॉचटॉवर उभारले होते. या वॉचटॉवरच्या माध्यमातून विसर्जनाच्या कामावर देखरेख ठेवण्यात येत होती. वसई-विरार, नवघर-माणिकपूर, नालासोपारा व ग्रामीण भागातील तलावांतही विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. तर, अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरही प्रशासनाने जय्यत तयारी केली होती.११ दिवसांपूर्वी आगमन झालेल्या गणेशाला अनंत चतुर्दशीला निरोप देण्यात आला. मुंबई शहराच्या धर्तीवर वसई-विरार परिसरातही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे आगमन व निरोप अशा दोन्ही प्रसंगी प्रशासन व पोलीस यंत्रणा विशेष खबरदारीचे उपाय योजत असते. यंदाही पोलिसांनी जिल्ह्याहून अतिरिक्त पोलीस कुमक मागवली होती. महानगरपालिकेनेही विसर्जनसमयी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता विविध स्तरांवर उपाययोजना केली होती. या दोन्ही विभागांच्या समन्वयातून यंदाचे विसर्जन निर्धोकपणे पार पडले. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सर्वत्र मिरवणुका निघाल्या तरी कुठेही वाहतुकीची कोंडी झाली नाही. ----------लाडक्या बाप्पाला निरोपपालघर : अनंत चतुर्दशीचा विसर्जन सोहळा उत्साहात, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला जावा, या दृष्टीने पालघर जिल्हा प्रशासनासह पालघर नगरपरिषद, पोलीस प्रशासनाने रविवारी आपले कर्तव्य चोख पार पाडले. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना सुरक्षाव्यवस्था, वाहतूक व्यवस्थेसह विसर्जनाच्या ठिकाणीही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर, सर्व गणेशोत्सव मंडळांचे स्वागत करण्यासाठी विविध राजकीय पक्ष, संघटना यांनी स्वागत कक्ष उभारून स्मृतिचिन्हांचे वाटपही केले.पालघर जिल्ह्यात घरोघरी विराजमान झालेले सर्वांचे लाडके बाप्पा ११ दिवसांचा पाहुणचार आटोपून रविवारी स्वगृही परतले. आपल्या बाप्पाला साश्रुनयनांनी निरोप देताना गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा जयघोषात जिल्ह्यात १९१ ठिकाणी बाप्पाचे विसर्जन झाले. ४ हजार ७११ खाजगी तर ५०६ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात गणेशभक्त, मंडळ कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, पालिका कर्मचारी, पोलीस इ. सारे मोठ्या भक्तिभावाने आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत होते.पालघर शहरामध्ये खाजगी ६५ तर सार्वजनिक ३० गणपती बाप्पांचे विसर्जन गणेशकुंडांमध्ये झाल्याने नगरपालिकेने तराफे, जीवरक्षक साहित्यासह कर्मचारी सज्ज ठेवले होते. तर, सात अधिकाऱ्यांसह सुमारे ५० कर्मचाऱ्यांची यावर देखरेख होती. सर्व गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी, त्यांना पाणी, अल्पोपाहाराच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे, आरपीआय, सोमवंशी क्षत्रिय मंडळ इ.नी स्वागत कक्ष उभारले होते. पालघरमधील सर्वात मोठा जुना पालघरचा राजा, तिवारी बंधूंचा फुलांचा राजा इ. गणपती मंडळांचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. त्यामुळे ५ वाजल्यापासून पालघर शहरातील सर्व रस्ते गर्दीने गजबजले होते. ----------विक्रमगडच्या राजाचे जल्लोषात विसर्जनविक्रमगड : विक्रमगड तालुक्याची तसेच विक्रमगड शहराची शान असलेल्या चालक-मालक मित्र मंडळाच्या राजाला ढोलताशे, बॅण्जोच्या गाण्यांवरील नृत्य, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, उंदीर मामा की जय, या घोषणांच्या जोशात भावपूर्ण निरोप देण्यात आला. या वेळी महिलांसह हजारो भाविकांची उपस्थिती होती़ तर, विक्रमगड पोलीस कार्यक्षेत्रातील इतर घरगुती, छत्रपती शिवाजी चौक मंडळ व पोलीस बालगोपाळ मंडळाच्या १० दिवसांच्या गणरायाला भक्तांनी प्रेमाचा भावपूर्ण निरोप दिला़ विक्रमगड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून चालक-मालक सार्वजनिक मंडळ सेवा करीत असून अनंत चतुर्दशीपर्यंत १० दिवस राजाची (बाप्पाची) प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने केली जात़े या १० दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, तर बाप्पाला निरोप देण्याच्या आदल्या दिवशी पूर्ण गावाला भंडारा (भोजन) देण्याची प्रथा आहे़ तर, हा कार्यक्रम १० दिवसांत पूर्णपणे शांततेत व चांगल्या भक्तिमय वातावणात पार पाडला.या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा मंडळाकडून सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असल्याची माहिती मंडळाचे संदेश हरिभाऊ राऊत व मिलिंद मुरलीधर मेहेर यांनी पत्रकारांना दिली. तर, दहा दिवसांच्या गणरायांमध्ये विक्रमगड पोलीस कार्यालयाच्या बालगोपाळ मंडळाची यंदा नव्याने १० दिवसांच्या गणपतीमध्ये भर पडली. त्यात छत्रपती शिवाजी चौक मित्र मंडळासह इतर घरगुती गणेशमूर्तींचा समावेश असून विसर्जनाकरिता तांबाडी नदीवर विसर्जित केल्या़ विक्रमगड ग्रामपंचायतीने तांबाडी नदीस रोषणाई व विजेच्या माळा लावून भक्तांच्या स्वागताकरिता तयारी केली होती. तर, नदीवर विसर्जनाकरिता उशीर होत असल्याने लाइटची व्यवस्था केली होती. या वेळीही पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त होता़
पुढच्या वर्षी लवकर या...!!
By admin | Updated: September 29, 2015 01:12 IST