पंढरीनाथ कुंभारभिवंडी : पावसाळ्याच्या निमित्ताने महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी करण्यात येणार्या नालेसफाईला अडथळा ठरलेली अनधिकृत बांधकामे हटवण्यात मनपाचे अधिकारी व अभियंता अपयशी ठरले आहेत. गेल्या वर्षी शांतीनगर येथील गटारावर जाळी न लावल्याने चार वर्षांची मुलगी नाल्यात वाहून गेली होती़ तिचे प्रेतही सापडले नाही. त्यामुळे शहरातील बरीच गटारे, नाले व रस्त्यांवरील लोखंडी जाळ्या न लागल्याने ऐन पावसाळ्यात जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात मोठमोठे नैसर्गिक नाले असून काही नाल्यांशेजारी अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याने त्या ठिकाणी नाले अरुंद झाले आहेत. वर्षानुवर्षे ही अनधिकृत बांधकामे न हटवता नालेसफाई केली जाते. परंतु, पावसाचा जोर वाढल्यास अशा ठिकाणी पाणी तुंबून ते परिसरातील लोकवस्तीत शिरून वित्तहानी व जीवितहानी होण्याचा धोका संभवतो. याबाबत, मनपाच्या बांधकाम विभागाकडून नेहमी कोर्टाच्या केसचा हवाला दिला जातो. वास्तविक, पालिकेच्या विधी व बांधकाम विभागाने या वस्तुस्थितीची दखल घेऊन कोर्टातील दाव्याचा पाठपुरावा करणे क्रमप्राप्त आहे. तसेच शाळा, मुख्य रस्ते, मुख्य चौक, रस्त्यांच्या मध्यभागी अशा रहदारीच्या ठिकाणी असलेली उघडी गटारे व नाल्यांच्या ठिकाणी मनुष्यहानी व जीवितहानी होऊ नये, म्हणून लोखंडी जाळ्या बसवून घेणे अत्यंत निकडीचे आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ठेकेदाराने या कामात कुचराई केल्याच्या तक्रारी लोकांकडून येत आहेत. त्यामुळे कामचुकारपणा करणार्या ठेकेदारावर आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नालेसफाईस अनधिकृत बांधकामांचा अडथळा
By admin | Updated: May 7, 2014 01:28 IST