भार्इंदर : सत्ता स्थापनेपासून शिवसेना, भाजपात सुरू असलेली कुरबूर यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच उफाळून आली आहे. एकमेकांवर केले जाणारे आरोप-प्रत्यारोप दोन्ही पक्षांनी थांबवून एकत्रित निवडणूक लढवावी, असा सल्ला रिपाइचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे. मिरा-भार्इंदर शहर (जिल्हा) अध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांच्यावतीने झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईसह इतर पालिका निवडणुकीत सेना-भाजपाने युती तोडून स्वतंत्र लढल्यास त्यांच्या विजयाची शक्यता कमी असल्याचे भाकित त्यांनी व्यक्त केले. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फायदा होईल. आघाडी सरकारमध्ये एकमेकांवरील कुरघोडींसह त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच नागरिकांनी त्यांना नाकारले. तशी परिस्थिती स्वतंत्रपणे लढल्यास सेना, भाजपाची होऊ नये यासाठी एकत्र लढणे आवश्यक आहे. केंद्र व राज्याच्या सत्तेत रिपाइचा मोठा वाटा असल्याचा दावा करीत त्यांनी दलितांना सत्तेत वाटा देण्याची अपेक्षा व्यक्त केली. भाजपाच्या विजयासाठी रिपाइने केलेल्या सहकार्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला केंद्रात मंत्रीपद देणार अशी ग्वाही दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील मंत्रिमंडळासह महामंडळात रिपाइला दहा ऐवजी पाच टक्के वाटा मिळावा. केंद्र सरकारबाबत बोलताना त्यांनी युती तुटल्यास भाजपा सरकार अल्पमतात येणार नाही. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तास्थापनेवेळीच भाजपाला बाहेरुन पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय रिपाइसुद्धा भाजपासोबतच राहणार असल्याने सेनेने पाठिंबा काढला तरी फरक पडणार नाही असे आठवले यांनी स्पष्ट केले. पालिका निवडणुकीतही सेना, भाजपा युती झाली नाही तर भाजपा, रिपाइ युती नक्की होईल, असा दावा केला. (प्रतिनिधी)
पालिका निवडणूक एकत्रितच लढवावी
By admin | Updated: June 23, 2016 03:06 IST