कल्याण : राज्य सरकारने १ जुलैला राज्यभरात दोन कोटी झाडे लावण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने केडीएमसीला २० हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्याची पूर्वतयारी झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त वर्षभरात सव्वा लाख झाडे लावण्यात येणार आहेत.महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वृक्षारोपणाच्या विशेष मोहिमेत महापालिकेबरोबरच विकासकांचेही मोठे योगदान असणार आहे. आपटा, कांचन, नीम, बहावा, आवळा, करंज, गुलमोहर, सोनमोहर, बेल आदी झाडांची रोपे नागरिकांना दिली जाणार आहेत. तसेच सामाजिक संस्था, मंडळे, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये, ज्येष्ठ नागरिक संस्था यांनाही रोपे दिली जाणार आहेत. रोपांची लागवड आणि संवर्धनाची जबाबदारी संबंधित संस्थांची राहणार आहे.वृक्षारोपण करणाऱ्या संस्था व देखभाल करणाऱ्या संस्थांना विकासकांना ट्री- गार्डसवर स्वत:ची जाहिरात करण्याची परवानगी दिली आहे. याबाबत महापालिकेशी थेट संपर्क साधावा अथवा नगरसेवकाच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला जाईल, अशी माहिती देवळेकर यांनी दिली. महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीला सर्वपक्षीय पदाधिकारी आणि वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
केडीएमसी लावणार दीड लाख झाडे
By admin | Updated: June 25, 2016 01:32 IST