ठाणे : कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे हे रत्नागिरी अधीक्षकपदी कार्यरत असताना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना सहा लाखांच्या रोख रकमेचे पारितोषिक देऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी गौरवण्यात आले आहे. ‘प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा-२०१६’ याअंतर्गत राज्यस्तरांवरील गटात द्वितीय क्रमांक पटकावल्याने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.उपायुक्त शिंदे यांनी लोकाभिमुख पोलीस प्रशासन कामगिरी करताना, मिडास टच कन्सल्टन्सी या संस्थेच्या माध्यमातून पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची सकारात्मक मानसिकता निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील ६०० जणांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच संकटग्रस्त जनतेसाठी तत्काळ पोलीस मदत मिळावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे प्रतिसाद नावाचे अॅप तयार केले. सागरी हद्दीत सुरक्षा अधिक बळकट व परिणामकारक करण्यासाठी ई-बीट मार्शल पेट्रोलिंग कार्यरत केली. हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी बुरोंडी तालुका दापोलीत संमिश्र वस्तीचे व जातीयदृष्ट्या संवेदनशील पूर्वेतिहास असलेल्या गावांमध्ये अभिनव सामंजस्य करार ‘बुरोंडी पॅटर्न’ या नावाने केला. तसेच वाहतूक व्यवस्था व नियमनाबाबत २०१३-१६ या तीन वर्षांत जनजागृती केली. त्यामुळे अपघातांचे प्रमाण घटले, त्याचबरोबर कोंडी दूर करण्यासाठी आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली. याचबरोबर पोलीस प्रशासनांतर्गत सुविधांवर त्यांनी भर दिल्याने हा गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)
कल्याणच्या पोलीस उपायुक्तांचा गौरव
By admin | Updated: April 24, 2017 02:23 IST