लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अवयवदानामुळे गरजूंना जीवनदान तर मिळते. मात्र, त्याचबरोबर त्यांच्यात जगण्याची नवीन उमेद निर्माण होते. अवयवदान हे खरंच श्रेष्ठदान आहे. त्यातच तनुजा यांनी भावासाठी यकृतदान करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हाच लढाऊ प्रवास त्यांनी पुस्तकातून सर्वांसमोर आणला आहे, असे मत प्रसिद्ध डॉ. नितीन नरावणे यांनी मांडले.जयंत झांबरे लिखित आणि व्यास प्रकाशन प्रकाशित ‘आकाश उजळून येताना’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी सायंकाळी पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला डॉ. पारिजात गुप्ते, निलेश गायकवाड उपस्थित होते. जयंत झांबरे हे यकृताच्या आजाराने ग्रस्त असताना बहीण तनुजा यांनी यकृतदान केल्याने झांबरे पुन्हा नव्या उमेदीने जीवन जगत आहेत. यकृताच्या आजारावर यकृत प्रत्यारोपण ही नवसंजीवनी ठरते आहे, असे मतही नरावणे यांनी व्यक्त केले. या वेळी बोलताना लेखक जयंत यांनी यकृताचा आजार झाल्यापासून ते यकृत प्रत्यारोपणापर्यंतचे अनुभव उपस्थितांना सांगितले. तसेच यकृत प्रत्यारोपणाबाबत समाजात अनेक समजगैरसमज आहेत. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी हे पुस्तक मी अधिकाधिक लोकांपर्यंत विनामूल्य पोहोचवणार आहे, असेही झांबरे यांनी सांगितले. तर, यकृतदानाचा हा प्रवास म्हणजे जिद्दीची, नात्याच्या अनुबंधाची आणि खंबीरतेची एक गोष्ट आहे, असे निलेश गायकवाड यांनी सांगितले.
पुस्तकाद्वारे यकृतदानाचा लढाऊ प्रवास
By admin | Updated: June 30, 2017 02:47 IST