उल्हासनगर : शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीपात्रातून रविवारी सायंकाळी ७ नंतर उग्र दर्प येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नदीकिनाऱ्याजवळ असलेल्या कैलास कॉलनी, शिवमंदिर, भरतनगरमधील शेकडो नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊन उलट्या, डोळे चुरचुरणे, डोकेदुखी होत असल्याने एकच गोंधळ उडाला. नागरिक रस्त्यावर आल्याने, नगरसेवक अंजली साळवे, प्रमोद टाळे आदींसह समाजसेवकांनी पोलीस व प्रदूषण मंडळाला माहिती दिली.
शहरातील कैलास कॉलनी, भरतनगर, शिवमंदिर येथील नदीपात्रातील उग्रवासाने शेकडो नागरिक रस्त्यावर आल्याने एकच खळबळ उडाली. काॅंग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे, नगरसेवक अंजली साळवे, प्रमोद टाळे, माजी नगरसेवक शांताराम निकम, समाजसेवक सुरेश सोनावणे, संजय वाघमारे, प्रशांत चंदनशिवे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. प्रदूषण मंडळ यांच्यासह महापालिका अग्निशमन विभागाला माहिती दिली. प्रदूषण मंडळ व पोलिसांनी रात्रभर नदीकिनारी टॅंकरमधून अथवा रासायनिक कारखाने विषारी सांडपाणी सोडतात का, आदीची चौकशी केली. मात्र, हाती काहीएक लागले नाही. या प्रकाराने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी वालधुनी बचाव संघटनेसह समाजसेवक रात्रंदिवस काम करत आहेत. रोहित साळवे यांनी अनाेळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी प्रदूषण मंडळ अधिकारी व पोलिसांना केली. नागरिकांनी नगरसेवक, पालिका अधिकारी, पोलीस व प्रदूषण मंडळाच्या अधिकारी यांच्या मदतीने नदीकिनारी पाहणी केली, मात्र नदीपात्रात विषारी द्रव सोडणारे सापडले नाही.
जीन्स कारखान्यावरील कारवाईवर प्रश्नचिन्हवालधुनी नदी प्रदूषित केल्याचा ठपका जीन्स कारखान्यावर ठेवून ते बंद केले, मात्र त्यानंतरही वालधुनीचे प्रदूषण कमी न झाल्यामुळे जीन्स कारखान्यांवरील कारवाईवर प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहे. यापूर्वी २०१४ मध्ये नदीतील उग्रवासाने ४०० पेक्षा जास्त नागरिकांना बाधा झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०१४ ला नदीपात्रात टँकरद्वारे विषारी द्रव्य सोडल्याप्रकरणी १३ जणांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन सहा टँकर जप्त केले होते.