उल्हासनगर : पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई व रस्ते दुरुस्तीला विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामे म्हणून या कामांना मंजुरी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे महापालिका आयुक्त करणार आहेत. लवकरच ही कामे हाती घेतली जातील, असेही त्यांनी सांगितले आहे.उल्हासनगरात वालधुनी नदी, खेमाणी, डॉल्फिन, गायकवाडपाडा नाल्यांसह लहानमोठे ४२ नाले आहेत. त्यांची लांबी ३९० किलोमीटर आहे. महापालिकेने नालेसफाईसाठी निविदा मागवल्या आहेत. मात्र, त्या उघडण्यापूर्वी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. नालेसफाई व रस्ता दुरुस्तीची कामे लांबणीवर टाकता येत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून अत्यावश्यक कामे म्हणून त्यांना मान्यता घेणार असल्याचे आयुक्त मनोहर हिरे यांनी सांगितले. लवकरच नालेसफाईची कामे सुरू केली जातील. ती जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होतील, असेही त्यांनी सांगितले. शहरातील नालेसफाईसाठी एक कोटी ६२ लाख, तर रस्ते दुरुस्तीसाठी चार कोटींची तरतूद केली आहे. नालेसफाईबरोबरच रस्ते दुरुस्ती व पुनर्बांधणीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. मागील वर्षी एकाच कंत्राटदाराला नालेसफाईचा ठेका दिल्याने गोंधळ उडाल्याचा आरोप झाला होता. या वर्षी प्रभाग समितीनिहाय वेगवेगळ्या कंत्राटदाराला सफाईचे कंत्राट द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते मनोज लासी यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. दरवर्षी सखल भागात व वालधुनी नदीकिनारी असलेल्या शांतीनगर, संजय गांधीनगर, सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, वडोलगाव, हिराघाट आदी परिसरांतील घरांत पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. त्या टाळण्यासाठी नालेसफाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे संकेत हिरे यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)
पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By admin | Updated: May 12, 2016 02:06 IST