- अजित मांडके, ठाणेशहरातील काही महत्त्वांच्या विषयांच्या प्रकरणांना मंजुरी देण्याच्या मुद्यावरुन महापौर हे आयुक्तांकडे वारंवार विचारणा करीत असल्याची घटना ताजी असतांनाच, आता नियमाला डावलून अथवा महापौरांशी कोणतीही चर्चा न करता आयुक्तांनी महासभेच्या अजेंड्यामध्ये घुसखोरी करून तब्बल २८ विषय परस्पर घातले. यामुळे गुरुवारी आयुक्त आणि महापौर यांच्याच चांगलीच खडाजंगी उडाली. यावरून सचिवांनादेखील महापौरांनी फैलावर घेतल्याची माहिती पालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली. एकूणच या मुद्यावरुन महापौर प्रथमच आक्रमक झाले असून पुढे याचा निकाल काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महासभेचा अंजेडा तयार होत असताना कोणते विषय घ्यावेत कोणते घेऊ नयेत, याची चर्चा प्रथम महापौरांकडे होते. महापौरांनी जर एखाद्या विषयाबाबत आक्षेप घेतला तर तो विषय मागे ठेवला जातो. परंतु, मागील काही महिन्यांपासून महापालिका स्वत:च काही विषय अजेंड्यात घालत होती. त्यामुळे महापौरांचा काहीसा नाराजीचा सूर होता. परंतु, आता प्रशासनाने अतीच केल्याची बाब या महासभेच्या निमित्ताने समोर आली आहे. महासभेचा अजेंडा जेव्हा अंतिम झाला तेव्हा पटलावर महापौरांनी जे विषय अंतिम केले होते, तेच पटलावर घेतले होते. त्यानुसार पटलावर सुमारे २३ विषयच होते. परंतु दोनच दिवसात यामध्ये अधिकच्या २८ विषयांची भर पडून हा अजेंडा ५१ विषयांवर गेला. मिळालेल्या माहितीनुसार महापौरांनी अंजेडा अंतिम केल्यानंतर तो पुन्हा आयुक्तांना दाखविला आणि येथेच आयुक्तांनी थेट २८ विषय घुसविल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर महापौरांच्या टेबलावर ठेवला. परंतु त्यात वाढ कशी झाली असा सवाल उपस्थित करुन महापौरांनी सचिव विभागाला धारेवर धरले आहे. तसेच आयुक्तांबरोबरही बाचाबाची झाल्याची चर्चा आता पालिका वर्तुळात सुरु झाली आहे. या संदर्भात महापौर संजय मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (प्रतिनिधी)काय आहेत, ते अधिकचे विषयमहापौरांनी अजेंडा अंतिम केल्यानंतर आयुक्तांनी महासभेतील घोषवाऱ्यात १०८ क्रमांकापासून ते १३५ क्रमांकपर्यंतचे विषय घातले आहेत. यामध्ये मुक बधीर बालकांवर प्राथमिक अवस्थेत कॉकलिअर इप्लांट शस्त्रक्रिया, खाडीचे पाणी पिण्यायोग्य करणे, खाडीपात्रात जलविद्युत प्रकल्प उभारणे, आकाशगंगा सोसायटी, राबोडी येथील नाल्यावरील जुना पुल तोडून नवा बांधणे, मासुंदा तलाव, ब्रम्हांळा तलाव, सिद्धेश्वर तलाव, मदार्डे कोलबाड तलावांचे सुशोभीकरण, नितिन कंपनी ते रमाबाई आंबेडकर उद्यानापर्यंत सर्व्हिस रोडचे नुतणीकरण, कळव्यातील प्रभाग क्र. ४३ मध्ये बसडेपो विकसित करणे, एलबीएस मार्गावरील तीनहातनाका ते मुलुंड चेकनाका पर्यंत रस्ता रुंदीकरण, महापालिका शाळेतील मुलांना मध्यान्ह भोजन, तसेच इतर प्रभागातील रस्त्यांची डागडुजी, नव्याने रस्ते विकसित करणे उपवन तलाव येथे बनारस घाट आणि अॅम्पी थिएटरची निर्मिती आदी विषयांचा यात समावेश आहे.अजेंड्याचा नियम काय सांगतो?नियमानुसार एकदा महापौरांनी अंजेडा अंतिम केल्यानंतर प्रशासनाला कोणत्याही प्रकारे विषय टाकता येऊ शकत नाहीत. किंबहुना विषय टाकायचेच असतील तर, त्यासाठी महापौरांची परवानगी घेणे आवश्यक असते, किंवा त्यांच्याशी चर्चा करुनच ते विषय टाकता येऊ शकतात. परंतु, याबाबतीत जयस्वाल यानी महापौरांना अंधारात ठेवले आहे.
अजेंड्यावरून आयुक्तांचा महापौरांना ठेंगा
By admin | Updated: June 17, 2016 02:13 IST