लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहर अभियंता रामप्रसाद जयस्वाल हे काम करत नसल्याचा ठपका ठेवत त्यांना पदमुक्त करण्याचा ठराव सत्ताधारी भाजपाने आगामी महासभेत ठेवला आहे. तसेच प्रभारी कार्यभार न देता अधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी पदभार द्यावा, अशी मागणी केली आहे. यावरून सत्ताधारी विरुद्ध प्रशासन असा सामना रंगणार अशी चिन्हे आहेत. दरम्यान, प्रस्ताव नियमानुसार असेल तरच त्याची अंमलबजावणी होईल, असे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सांगितले. शहरात विकासकामे ठप्प पडली आहेत. अशा वेळी सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी व मीना सोंडे यांनी काही अधिकाऱ्यांना प्रभारी पदभाराऐवजी कायमस्वरूपी नियुक्ती करण्याचा व शहर अभियंता जयस्वाल यांना पदमुक्त करण्याचा प्रस्ताव आणला आहे. तसेच ठोस वेतनधारक कर्मचाऱ्यांना कायस्वरूपी नियुक्त करण्याचा प्रस्ताव महासभेत आला. गुरुवारी महासभा होणार असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. जयस्वाल यांनी १० लाखांपेक्षा कमी बिलाचा प्रकार आयुक्तांसमोर मांडल्याने वादाला तोंड फुटले आहे.कॅम्प नं-५, वाल्मीकीनगर परिसरात श्रमसाफल्य योजनेच्या नावाखाली तीन इमारती बांधल्या आहेत. यातील १८० घरांची मालकी सफाई कामगारांना देण्याला पालिकेने विरोध केला आहे. बीएसयूपी व श्रमसाफल्य योजनेंतर्गत आलेला निधी पालिकेच्या दुर्लक्षतेमुळे व तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या अनास्थेमुळे परत गेला. तिन्ही इमारती पालिकेने स्वत:च्या निधीतून बांधल्याचे उघड झाले आहे. तसेच खेमानी नाला वळवण्याचे काम ठप्प पडले आहे. ३०० कोटींची योजना राबवूनही पाणीटंचाई कायम आहे. रस्ताबांधणी, अंबरनाथ-कल्याण रस्त्याची पुनर्बांधणी, कचऱ्याचे कंत्राट आदी अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्या सोडण्याऐवजी महासभेत कायमस्वरूपी व अधिकारी हटाव यासारख्या प्रस्तावाबद्दल विरोधी पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे.
पालिका शहर अभियंता जयस्वालांना पदमुक्त करा
By admin | Updated: May 16, 2017 00:07 IST