कल्याण : केडीएमसी हद्दीतील १० गावांमध्ये एकूण एक हजार ०८९ हेक्टरच्या क्षेत्रापैकी पहिल्या टप्प्यात ३३० हेक्टर क्षेत्रात ग्रोथ सेंटर साकारण्यात येणार आहे. पण ग्रोथ सेंटर म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण ग्रामस्थांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारच्या भेटीत देणे अपेक्षित होते. मात्र त्याबद्दल त्यांनी ‘ब्र’ही काढला नाही. त्यामुळे ही घोषणा तरी खरी आहे का की पुन्हा येथील नागरिकांना ‘मामू’ (महामुर्ख) बनवणार, अशी टीका केडीएमसीचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी केली. ग्रोथ सेंटरमध्ये गावातील स्थानिक तरुण भूमिपुत्रांना रोजगार मिळणार का, हे सेंटर व्यवसायभिमुख असणार आहे, का याची माहिती सविस्तरपणे द्यावी, अशा आशयाचे निवेदन भोईर, गटनेते मंदार हळबे, नगरसेविका सरोज भोईर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. (प्रतिनिधी)
कल्याणमधील ग्रोथ सेंटरबद्दल मुख्यमंत्र्यांचे मौन
By admin | Updated: June 21, 2016 01:12 IST