बिर्लागेट : कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या आणि प्रस्तावित मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे ज्या रायते गावातून जाणार आहे, तेथे स्मशानभूमी नसल्याने तीन मृतदेहांवर मेणबत्तीच्या प्रकाशात उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्यात आले.स्थानिक राजकारणामुळे स्मशानभूमी उभारण्याचे काम अडकले असल्याने गावातील आदर्श मित्र मंडळाने स्मशानभूमी म्हणून तात्पुरती शेड उभारण्याची तयारी सुरू केली आहे. बेबी जाधव, सुकऱ्या सुरोशी व राम बडेकर यांच्यावर स्मभानभूमी नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार केल्याचे माहिती आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष सुदाम भोईर यांनी ‘लोकमत’ला दिली. उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या रायते गावाची लोकसंख्या साडेतीन ते पाच हजार आहे. गावात शाळा, महाविद्यालय, पोस्ट आॅफिस, दवाखाने आदी सोयीसुविधा आहेत. सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अलीकडेच करण्यात आले. मात्र, गावात स्मशानभूमी नाही. (वार्ताहर)
स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार
By admin | Updated: November 15, 2016 04:35 IST