भार्इंदर : एका बाजूला उत्पन्नात वाढ होत नसताना दुसरीकडे सुविधांसाठी खर्च होत आहे. त्यामुळे तूट वाढत आहे. ही भरून न निघाल्यास भविष्यात नागरी सुविधा देणे अशक्य होईल, अशी सूचना प्रशासनाने अंदाजपत्रकात व्यक्त केली आहे. उत्पन्नात वाढ करण्यासाठी कर, पाणीपट्टीवाढ तसेच पालिकेच्या जागा भाड्याने देणे गरजेचे आहे, असे मतही नोंदवले आहे. मीरा-भार्इंदर पालिकेने गेल्यावर्षीच्या १ हजार ३८९ कोटींच्या अंदाजपत्रकात यंदा ५३ कोटींची वाढ करून एकूण १ हजार ४४२ कोटी ८९ लाख २८ रुपयांचे अंदाजपत्रक उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी शुक्रवारी स्थायी सभापती प्रभाकर म्हात्रे यांना सादर केले. मुख्य लेखापरीक्षक एम.एम. निपाणे, मुख्यलेखाधिकारी शरद बेलवटे, सहायक लेखाधिकारी सुरेश घोलप, माजी स्थायी सभापती शरद पाटील, हरिश्चंद्र आमगावकर, सदस्य प्रेमनाथ पाटील उपस्थित होते. यंदाचे अंदाजपत्रक १५ लाख ६० हजार शिलकीचे असून त्यात कोणतीही करवाढ व नवीन प्रकल्प तसेच योजनांचा समावेश नाही. महासभेपुढे १९ फेब्रुवारीपूर्वी अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. सरकारी अनुदानाखेरीज एकूण ४५८ कोटी ३२ लाखांचे मूळ उत्पन्न असलेल्या या अंदाजपत्रकात एमएमआरडीए व इतर संस्थांमार्फत घेण्यात आलेले एकूण २३३ कोटी कर्ज दाखवण्यात आले आहे. या आर्थिक वर्षात त्यात १२९ कोटींची वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)
उत्पन्नवाढ झाल्यास सुविधा देणे शक्य
By admin | Updated: February 11, 2017 03:49 IST