कल्याण : आधारवाडी डम्पिंग हे भ्रष्टाचाराचे ग्राउंड आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळेच डम्पिंगची समस्या आजवर निकाली निघालेली नाही, असा आरोप स्थानिक नगरसेवक वरुण पाटील यांनी सोमवारच्या महासभेत केला. त्यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनीही डम्पिंग आगीच्या मुद्यावर लक्षवेधी मांडली होती. यावर चर्चा करताना नाकर्तेपणाबाबत केडीएमसी प्रशासनाला सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. आधारवाडीतील डम्पिंग ग्राउंडला वारंवार आग लागत आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे डम्पिंग शेजारील साठेनगर, खडकपाडा, लालचौकी येथील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या मुद्यावर सोमवारच्या महासभेत लक्षवेधी मांडण्यात आली होती. यावर चर्चेच्या वेळी डम्पिंग परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनावर कसा विपरित परिणाम झाला आहे, याची उदाहरणे पाटील यांनी सभागृहात दिली. तरुणांची लग्न मोडत आहेत, त्याचबरोबर नागरिकांना श्वसनाचे विकार जडत असल्याचे त्यांनी सांगितले.महापालिका डम्पिंगवर वर्षाला ७० ते ८० लाख रुपये खर्च करते. परंतु, यात मोठ्या प्रमाणावर घोटाळा आहे. परिणामी ठोस कृती होताना दिसत नाही. भंगारमाफियांमुळे डम्पिंगला अभय मिळतेय का, असा सवाल ही यावेळी केला. डम्पिंगवर केल्या जाणाऱ्या फवारणीतही भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. दीड वर्षात डम्पिंग बंद होईल, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. परंतु, याची शाश्वती काय, आम्हालाच नागरिकांना तोंड द्यावे लागत असल्याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)
आधारवाडी डम्पिंग भ्रष्टाचाराचे ग्राउंड!
By admin | Updated: June 23, 2016 03:01 IST