नेवाळी : मलंगरोडवरील द्वारली गावाजवळून जाणाऱ्या मलंगरोड रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चेतना ते नेवाळी नाका या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले असले तरी. द्वारली गावाजवळील काम आजही झाले नसल्याने या रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच लहान-मोठ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या खराब रस्त्यामुळे लहान-मोठे अपघात झाले असून तीन ते चार जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अजून किती बळी जाण्याची पालिका वाट पाहत आहे? असा सवाल विचारला जात आहे. मागील पावसाळ्यापासून हा रस्ता खड्डेमय असल्यामुळे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे कोणीही लोकप्रतिनिधी वा प्रशासन लक्ष देत नाही. आता तर नवीन पत्रीपूल सुरू झाल्यामुळे वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे द्वारली गावात वाहतूककोंडी होते. सकाळ, संध्याकाळ प्रचंड गर्दीचा सामना येथील नागरिकांना करावा लागतो. पथदिवे नसल्याने व खड्ड्यांमुळे रोजच वाहने नादुरुस्त होऊन बंद पडतात.
द्वारली गावाजवळील रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST