राहुल वाडेकर, विक्रमगडकविताचे दोन्ही पाय व हात जन्मत:च अपंग, तिला सरकत जाणे ही कठीण त्यातच श्रवणक्षमता कमी तरीही तिची बुद्धी तल्लख होती. मेहनत आणि शिकण्याची प्रबळ इच्छा याच्या जोरावर ती अपंगांच्या शाळेत न जाता सर्वसामान्य मुलांच्या शाळेत गेली आणि ग्रामीण भागात राहूनही तिने दहावीच्या परीक्षेत ८१.६० टक्के गुण मिळविले. विक्रमगडच्या कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयात शिकणाऱ्या कविता रविंद्र देसले या मुलीची ही कथा. कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयाची ही विद्यार्थिनी. जन्मत:च तिचे दोन्ही पाय वाकडे होते, तर हाताच्या मुठी आवळलेल्या होत्या. त्यामुळे आपल्या मुलीचे पुढे कसे होणार, या विवंचनेत असलेल्या तिच्या माता-पित्यांनी धीर न सोडता तिला मुंबईत नेले. नातेवाईकांच्या मदतीने तिच्यावर सलग दोन वर्षे उपचार केले.त्यानंतरही तिचे पाय आजही जमिनीला व्यवस्थित टेकवता येत नाहीत. हातावरील प्रदीर्घ उपचारानंतर केवळ बोटे उघडण्या पुरतेच ते वापरता येतात. अशाही स्थितीत ती अभ्यासाच्या गोडीने माले येथील मराठी शाळेत शिकली. त्यानंतर अपंगांच्या शाळेत न जाता तिने कस्तुरबा गांधी कन्या विधालयात प्रवेश घेतला. तिचे आई-वडील मोलमजूरी करून कुटुंबाचा गाडा हाकतात कविताची अभ्यासातील प्रगती पाहून तिचे चुलत भावांनी भरघोस शैक्षणिक व आर्थिक मदत केली. तिच्या घरची परिस्थिती खूप बिकट असल्याने पुढील शिक्षण कसे घ्यायचे हा यक्षप्रश्न तिच्या पुढे उभा राहिला आहे. कवितांचा वैद्यकीय खर्च आता पेलवत नाहीे. तिला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. परंतु तो तिच्या पालकांना परवडणारा नाही. तिला प्रशासकिय अधिकारी व्हायचे स्वप्न आहे. आर्थिक परीस्थिती बेताचीच असल्याने तीचे स्वप्न अधूरे राहण्याची शक्यता आहे. तिच्या या स्वप्नांना मदतीचे बल देण्याची गरज निर्माण झाली असून कविताला पुढील शिक्षणासाठी मदत करू इच्छिणाऱ्यांनी अमोल सांबरे- ९२७०२६६६९६, सचिनभोईर- ८४१२०७0१३१, सिद्धार्थ सांबरे-९७६५८२५४५४, रूपेश पाटिल-८६००९५०२०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन युवास्पर्श सामाजिक संघटनेने केले आहे.
अपंग कविताला ८२ टक्के
By admin | Updated: June 21, 2016 00:52 IST