चिकणघर : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांत बुधवार ते शनिवार असे चार दिवस सलग ६० तास पाणीपुरवठा बंद होता. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. आधीच ‘घर का ना घाट का’ अशी स्थिती निर्माण झालेली असताना त्यात पाणीबाणीची भर पडल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सध्या लग्नसराईची धामधूम सुरू असून पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. याकडे संघर्ष समिती, शिवसेना, भाजपा किंवा नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक आणि पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्र ार आहे. पालिका निवडणूक होऊन पाच महिने उलटूनही जैसे थे स्थिती आहे. नगरसेवक निवडून येऊनही उपयोग काय झाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामस्थांचा विरोध डावलून गावांचा पालिकेत समावेश झाल्याने समस्या सोडवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, असे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. तर, निधीची तरतूद केली नसल्याने महापालिका चालढकल करत आहे. यामध्ये नागरिकांची कोंडी झाली आहे. यासंदर्भात ड प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)
२७ गावांत ६० तास पाणीपुरवठा बंद
By admin | Updated: April 25, 2016 03:02 IST