ठाणे - तलावांचे प्रदुषण रोखण्यासाठी एकीकडे ठाणे महापालिकेने पावले उचलली असतांना दुसरीकडे शहरातील तरुणांनीसुध्दा आता तलाव स्वच्छतेच्या दृष्टीने आपली भुमिका बजावली आहे. त्यानुसार बुधवारी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कासारवडवली येथील तलावाचे संवर्धन करण्याची मोहीम आखण्यात आली होती. विहंग सरनाईक यांच्या ठाणे युनायटेड या संस्थेच्या पुढाकाराने व स्थानिक नागरिक, तरु णांच्या सहभागाने कासारवडवली तलाव श्रमदान करून स्वच्छ करण्यात आला. या तलावातून ४ टन कचरा यावेळी काढण्यात आला. यापुढे दर रविवारी तलाव स्वच्छता मोहीम पुढेही सुरु ठेवणार असल्याचे सरनाईक यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. कासारवडवली येथील तलावाची स्थिती चांगली व्हावी, या तलावाचे संवर्धन व्हावे म्हणून सरोवरम ही तलाव संवर्धन मोहीम राबविणार असल्याचे जाहीर केले होते. त्याला बीच वोरीयर्स या तरु णांच्या ग्रुपने पाठींबा दिला. २५० हुन अधिक लोक या तलाव स्वछता मोहिमेत बुधवारी सहभागी झाले होते. सकाळी ८ ते १० यावेळेत तरु णांनी श्रमदान सुरु केले. या तलावात सर्वात जास्त प्लास्टिक मिळून आले. पूजेसाठी वापरली जाणारी मडकी, पूजेचे साहित्य, विसर्जित केलेल्या मूर्ती एकत्रकरण्यात आल्या. पालिकेचे १२ सफाई कर्मचारीही या मोहीमेत सहभागी झाले होते. या २ तासांच्या श्रमदान मोहिमेतून ४ टन हुन अधिक कचरा गोळा करण्यात आला. कोणतीही मशिनरी न वापरता श्रमदान करून ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी या मोहिमेचे आयोजक विहंग सरनाईक यांनी सांगितले की, ठाण्याची ओळख तलावाचे शहर ही असून ती कायम राहिली पाहिजे. तलाव चांगले ठेवणे, त्यांचे संवर्धन करणे ही पालिके प्रमाणे शहरातील लोकांची, शहरातील नागरिकांची ही जबाबदारी आहे. त्यासाठी ही मोहिम राबविण्यात आली. यापुढे या तलावाची स्वच्छता दर आठवड्याला करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घोडबंदर भागातील कासारवडवली तलावातून काढला ४ टन कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 16:15 IST
शहरातील शिल्लक राहिलेल्या तलावांचे प्रदुषण रोखण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आता ठाणेकरांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार बुधवारी घोडबंदर भागातील कासारवडवली तलावाची सफाई या मंडळींनी केली आहे.
घोडबंदर भागातील कासारवडवली तलावातून काढला ४ टन कचरा
ठळक मुद्देप्रत्येक आठवड्याला सुरु राहणार मोहीमतलावांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न