बोईसर : पालघर तालुक्यातील एकूण सहा मंडळात आतापर्यंत सरासरी अवघा १४५.८ मि.मि. पाऊस पडला असून मागील वर्षाच्या तुुलनेत (२१ जून २०१५) ३३२.४ मि.मी. पाऊस कमी झाला आहे. आतापर्यंत अवघा चार दिवस किरकोळ पाऊस पडला असून पावसाच्या होत असलेल्या विलंबाबत शेतकरी चिंतातूर असून पेरणी करावी की नाही याबाबत संभ्रमावस्थेत आहेत.पालघर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे १,१७,८२४ हेक्टर असून त्यापैकी १६ हजार २२२.८४ हेक्टर क्षेत्रफळावर भातलागवड केली जात असून लागवडीच्या क्षेत्रापैकी १० टक्के नर्सरी क्षेत्र म्हणजेच भात बी पेरणी १६२२.२८ हेक्टर क्षेत्रफळावर करणे अपेक्षित आहे. मात्र मागील वर्षी (२०१५) तालुका कृषी विभागाच्या अहवालानुसार प्रत्यक्षात १५७३.६१ हेक्टर म्हणजेच ९७ टक्के भातपेरणी झाली होती.पालघर तालुक्यातील पालघर, मनोर, बोईसर, सफाळा, आगरवाडी व तारापुर या सहा मंडळातन पर्जन्यमानाचे मोजमाप होत असून त्या नंतर तालुक्याचे सरासरी पर्जन्यामान काढले जाते मागील वर्षी ३ आॅक्टोबर २०१५ पर्यंत एकूण २०५०.२ मि.मी. पाऊस झाला होता. तर ३० जून पर्यंत ६६९.२ मि.मि. पाऊसाची नोंद झाली होती.या वर्षाच्या पावसाळी हंगामात प्रथम पाऊस २६ मे रोजी ४.२ मि.मी. २९ मे ४.६ मि.मी. २० जून ३७.० मि.मी. व २१ जून रोजी ९५.० मि.मी. तर ८ मार्च २०१६ ०.५.० मि. मी. असा एकूण १४५.८ मि.मी. पाऊस पडला आहे. तर मागील वर्षी १२ जून २०१५ ला खऱ्या अर्थाने पाऊस पडुन दणक्यात सुरूवात केली होती. मागील वर्षी जुन महिन्यात एकूण सोळा दिवसात ६६९.२ मि.मी. पाऊस पडला होता (१६५.१ टक्के) जुलै महिन्यात चौदा दिवसात ७२८.५ मि.मी. (३५.३ टक्के) तर सप्टेंबर महिन्यात अवघे दोन दिवस पाऊस पडून फक्त १२ मि.मी. पाऊस (४.१टक्के) झाला होता. त्यानंतर ३ आॅक्टोंबर २०१५ पर्यंत एकूण पावसाची नोंद २०१५ मि.मी. झाली होती. या वर्षी आता वरुणराजा कोणते रंग दाखवतो याकडे संपूर्ण जिल्हयातील बळीराजाचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)
पालघर तालुक्यात १४५ मि.मी.
By admin | Updated: June 23, 2016 02:52 IST