पंढरपूर: विठ्ठलाचे पददर्शन घेण्यासाठी ऐन आषाढी यात्रा कालावधीत गोपाळपूर येथील विठ्ठल अभियांत्रिकी कॉलेजपासून ते रांग, दर्शन पत्रा शेड, पुन्हा रांग आणि ज्ञानेश्वर दर्शन मंडपाचे सात मजले आणि मंदिर असा प्रवास करावा लागणार आहे. हे अंतर आठ ते दहा कि. मी. इतके होणार असल्याने वारकऱ्यांना दर्शनासाठी आठ कि. मी. अंतर चालावे लागणार आहे. यासाठी मंदिर समितीने ऊन, वारा, थंडी, पाऊस यापासून बचाव होण्यासाठी तशी सोय केली आहे.आषाढी यात्रेतील दहा ते बारा लाख वारकऱ्यांना गर्दीचा त्रास होऊ नये, यासाठी पंढरपुरात ३ जुलैपासूनच वाहतूक मार्गात बदल करून त्यासाठी बॅरिगेटिंग करण्यात आले आहेत. स्थानिक रिक्षा, टांगा व अंतर्गत वाहतुकीसाठी परवाना देण्यात आला असून, या वाहनांसाठी मार्ग आखून देण्यात आले आहेत. पार्किंग सोय बाहेर करण्यात आल्याने कोणत्याही वाहनांना शहरात प्रवेश नाही. चंद्रभागा, भीमा बसस्थानकाबरोबरच कराड व सांगोला रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांसाठी बाहेर थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात मोठ्या वाहनांना प्रवेश बंद करून तसे जमिनीवर रोवलेले लोखंडी बॅरिगेटिंग करण्यात आल्याने मोठी वाहने शहरात प्रवेश करणार नाहीत. शहरातील वाहतूक मार्गात बदल ३ ते ११ जुलै या कालावधीत राहणार आहे.
दर्शनासाठी चाला आठ किलोमीटर!
By admin | Updated: July 6, 2014 01:28 IST