सोलापूर जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. असे असतानाही सोलापूर शहर व ग्रामीणमध्ये लसीकरण होत नाही. वास्तविक संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे ३ कोटी २५ लाखांपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले. परंतु बाकी जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात फक्त ५ लाख ९० हजार लसीकरण झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यास सुरुवातीपासून फार कमी लसी देऊन जनतेवर अन्याय केला जात आहे. लोकसंख्या व संसर्गदर पाहता इतर जिल्हे सोलापूरपेक्षा कमी असताना अनेक पटीने लसी दिल्या आहेत. जिल्ह्यात पहिल्या डोसचा कालावधी पूर्ण झालेले नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून नागरिकांचे लसीकरण करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आरोग्य राज्यमंत्री राजेश शामगौडा पाटील-येड्रावकर, विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिले आहे.