पंढरपूर : कुर्डूवाडी (ता. माढा) येथील रेल्वे कारखाना कायमस्वरुपी चालू करण्याबरोबरच व पंढरपूर-मुंबई ही रेल्वेगाडी रोज धावावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी बुधवारी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्रानेच भाजपाला चांगले यश मिळवून दिले आहे. यामुळे आम्ही एक शिष्टमंडळ तयार करून महाराष्ट्राचा विकास आराखडा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. या आराखड्यामध्ये महाराष्ट्रात जादा नोकरींची संधी उपलब्ध होण्यासाठी चांगले उद्योग, प्रकल्प, वीज, रस्ते, विविध विकासकामे सादर करण्यात येणार असल्याचे खा. आठवले म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत रिपाइंने राष्ट्रवादी व काँग्रेसला चांगलाच धडा शिकवला असून दलित मते महायुतीच्या बाजूने असल्याने जादा जागेवर उमेदवार निवडून आले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीसाठी २५ जागांची मागणी करणार आहे. यामध्ये १४ राखीव जागांची मागणी करणार आहे. त्याचबरोबर ५० टक्के जागांवर सर्व जातीचे उमेदवार उभे करणार आहे. अपक्ष आमदारांना रिपाइंबरोबर घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काही अभिनेते रिपाइंमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचे खा. रामदास आठवले यांनी सांगितले.यावेळी रिपाइंचे राजाभाऊ सरवदे, प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, सुनील सर्वगोड, आबासाहेब दैठणकर, हणमंत साठे, पुरुषोत्तम वाडेकर, जितेंद्र बनसोडे, बाळासाहेब कसबे, संतोष सर्वगोड, महादेव भालेराव, दीपक चंदनशिवे उपस्थित होते. ---------------------------जिल्ह्यातून दोन जागांची मागणी करुसोलापूर जिल्ह्यात रिपाइंची चांगली ताकद आहे. यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोन जागा रिपाइंला मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. रामदास आठवले यांनी सांगितले.
कुर्डूवाडी रेल्वे कारखान्यासाठी प्रयत्न
By admin | Updated: June 26, 2014 01:21 IST