सोलापूर: कविराय रामजोशी, कवी कुंजविहारी, कविवर्य रा. ना. पवार, कवी संजीव यांच्यानंतर मराठी साहित्य विश्वात प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख यांनी सोलापूरला मानाचे स्थान मिळवून दिले. ‘डांगोरा एका नगरीचा’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला... सरदेशमुख सरांच्या साहित्यकृतींनी अवघ्या मराठी मनावर भुरळ टाकली. त्यांचं चिंतनशील साहित्य आजही साहित्य रसिकांच्या खासगी ग्रंथसंग्रहात पाहायला मिळते; जितके साहित्य त्यांचे ग्रंथबद्ध झाले. त्यापेक्षाही त्यांनी केलेलं विपुल लेखन विखुरलेल्या अवस्थेत होतं. वाचक चळवळीचे नितीन वैद्य यांनी अथक परिश्रम घेऊन सुमारे हजार पानांचे हे साहित्य एकत्र केले आहे.सरदेशमुखांच्या विखुरलेल्या साहित्यात ‘कालिदास आणि शाकुंतल : एक अर्घ्यदान’ या साहित्यकृतीचे हस्तलिखित मिळाले. आषाढाच्या पहिल्या दिवशी २८ जून रोजी या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. गेल्या सात-आठ वर्षांत सरदेशमुखांच्या मासिक, दिवाळी अंकातून प्रकाशित झालेल्या आणि हस्तलिखित स्वरूपात विखुरलेल्या साहित्याचा शोध घेण्यासाठी नितीन वैद्य यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रंथालये धुंडाळली. त्यातून त्यांना हजार पानांचे साहित्य मिळाले. आपल्या शोधमोहिमेसंदर्भात वैद्य यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.वैद्य म्हणाले, सरदेशमुख यांनी सलग साठ वर्षे मराठीत स्वत:ची नाममुद्रा उमटविणारे लेखन केले. त्यांच्या अनेक साहित्यकृती लोकप्रिय झाल्या; पण आयुष्यभराच्या चिंतनातून त्यांनी लिहिलेले अप्रकाशित आणि विखुरलेले साहित्य बरेच होते. ते एकत्र करण्याचा ध्यास घेतला होता. आजच्या काळात हे कोण वाचणार? कशासाठी अट्टाहासाने हे जपायचे, असे प्रश्न जेव्हा उपस्थित व्हायचे तेव्हा सरांच्या साहित्यावर संशोधन करणाऱ्यांची नावे पुढे यायची. जीवन व्यवहार केवळ अर्थकेंद्री होण्याच्या आजच्या काळात, असे संचित जपण्याची गरज आहे, असे वाटले अन् मी कामाला लागलो. सोलापूरचे हि. ने. वाचनालय, पुण्याचे शासकीय ग्रंथालय, पुणे मसापचे ग्रंथालय, ‘एसएनडीटी’ ग्रंथालय... हा शोध सुरू होता. एकातून दुसरा, तिसरा, असे संदर्भ मिळत गेले. सरदेशमुख सरांच्या कन्या अनुराधा कशेळीकर आणि वसुमती भंडारे यांनी सरांचे दफ्तर, पत्रव्यवहार खुला करून दिला. त्यातूनही साहित्य मिळत गेले. मराठीतील नामवंत सूचीतज्ज्ञ डॉ. सू. रा. चुनेकर, सूचीकार शिल्पा सबनीस, रूपारेल कॉलेजचे ग्रंथपाल, लेखक डॉ. प्रदीप कर्णिक, ‘मौज’चे वितरक अरुण गाडगीळ यांनी या शोधमोहिमेत आस्थेने मदत केली, असे वैद्य यांनी सांगितले. -----------------------------शोधलेले साहित्यकविता - १५०, कथा - ३२, कादंबऱ्या - ३, वैचारिक लेख, समीक्षा - ३२, पुस्तक परीक्षण - १३, प्रस्तावना -६, अनुवादित नाटक - १, प्रदीर्घ निबंध - १, व्यक्तिचित्रण - ७, आत्मपर लेख - १५, भाषण हस्तलिखिते - ६, मुलाखती - ७------------------------------सरदेशमुख सरांचे मासिकांपुरते राहिलेले साहित्यवैभव मी पाहू शकलो, ते कुणीतरी निरपेक्षपणे जपल्यामुळेच. ही संधी मला अप्रत्यक्षपणे का होईना, सरांमुळेच मिळाली. त्यामुळे मी सरदेशमुख सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. सरांचे साहित्य शोधण्याकामी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानतो.- नितीन वैद्य, सदस्य, आशय संपादकीय मंडळ
त्र्यं. वि. सरदेशमुखांच्या विखुरलेल्या सहस्र पानी साहित्याचा शोध
By admin | Updated: June 25, 2014 01:41 IST