सोलापूर : जून महिना संपला तरी पाऊस न आल्याने शहरातील मुस्लीम बांधवांनी रविवारी सकाळी पावसासाठी रंगभवन येथील अहले हदीस ईदगाह मैदानावर सकाळी ८ वाजता नमाज पठण केले. भरपूर पाऊस पडून समस्त मानव जातीमध्ये सुख, शांती, समाधान नांदू दे अशी प्रार्थना करण्यात आली. प्रेम, शांती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन यावेळी मौलाना ताहेर बेग यांनी आपल्या प्रवचनात केले. निसर्ग नियमाप्रमाणे जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. जून महिना संपला तरी पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात उजनी धरणातील पाणीपातळी वजा २० टक्क्यांवर गेल्याने भविष्यातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे आता पावसाची गरज निर्माण झाली आहे. यंदा चांगली पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठी ईदगाह मैदानावर नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते. नमाज पठणापूर्वी बोलताना मौलाना ताहेर बेग म्हणाले की, पैसेवाले लोक जकात भरत नसतील, उद्योग-व्यवसायात सर्वसामान्य माणसाची फसवणूक करीत असतील तर या दोन कारणास्तव पाऊस होत नसतो. तसेच दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे, भ्रष्टाचार होत आहे. त्यासाठी अल्लाहकडे माफी मागून अपेक्षित कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे. त्यावर ‘अल्लाह’ आपले गुन्हे माफ करतो आणि पाऊस पाडतो. माणसाची नीतिमत्ता बदलत आहे, त्याचा परिणाम समस्त मानव जातीवर होत असतो, त्यामुळे ‘अल्लाह’ च्या आदेशानुसार आचरण केल्यास सुख, शांती कायम ठेवून विकास साधण्यास वेळ लागत नाही. सर्वांनी एकत्र येवून एकमेकांप्रति स्नेहसंबंध, महिलांविषयी आदर बाळगण्याची गरज आहे, असे आवाहन यावेळी मौलाना ताहेर बेग यांनी केले. यावेळी मुख्तार अहमद हुमनाबादकर, माजी महापौर आरिफ शेख आदी मान्यवरही उपस्थित होते. ---------------------------अनेकांनी वाहिले अश्रू...नमाज पठणादरम्यान ‘अल्लाह’कडे एकरूप होऊन अनेक मुस्लीम बांधवांनी आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. भरपूर पाऊस होऊ दे, समस्त मानव जातीची भरभराट होऊ दे, सुख, शांती नांदू दे अशी प्रार्थना केली.
पावसासाठी मुस्लीम बांधवांची प्रार्थना
By admin | Updated: July 7, 2014 00:59 IST