मोहन डावरे ल्ल पंढरपूरदासां सर्वकाळ।तेथे सुखाचे कल्लोळ।।जेथे वसती हरीचे दास।पुण्य पिके पापानास।।फिरे सुदर्शन।घेऊनियां नारायण।।तुका म्हणे घरी।होय म्हणियारा कामारी।।ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष... पंढरपूर जवळ येत असल्याचा वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद... आणि हरिनामाचा गजर... अशा उत्साही वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे उभे रिंगण बाजीराव विहीर येथे उत्साहात पार पडले.पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथील तालुक्यातील पहिला मुक्काम उरकून श्रीसंत तुकाराम महाराज पालखीने सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पिराची कुरोली येथून प्रस्थान ठेवले. दुपारी दोनच्या दरम्यान वाडीकुरोली-कोळ्याचा मळा येथे दुपारचा विसावा झाल्यानंतर श्रीसंत तुकाराम महाराज पालखीने रिंगण सोहळ्यासाठी वाखरी-बाजीराव विहिरीकडे प्रस्थान ठेवले. त्यानंतर पालखी मार्गावर भजन, कीर्तन, मनोरे, फुगड्या आदी पारंपरिक खेळ खेळत वैष्णवांचा मेळा सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान बाजीराव विहीर येथे पोहोचला. या ठिकाणी रिंगण सोहळ्यासाठी पालखी मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. यावेळी अर्धा तास प्रथम वीणेकरी, झेंडेकरी, टाळकरी यांचे चोपदारांनी रिंगण लावले.यानंतर ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष, अभंग, कीर्तनात वैष्णवांच्या मेळ्याने हवेत उंच उड्या घेऊन गजर केला. नंतर रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दिवसभराच्या कडक उन्हानंतर ढगाळ वातावरणात वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात तुकोबांच्या अश्वाने पालखीला दोन फेऱ्या मारल्यानंतर वैष्णवांनी खारीक-खोबरे उधळून रिंगण सोहळा पार पडल्याचे उड्या मारून स्वागत केले.हा रिंगण सोहळा डोळ्यांत टिपण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांवर, रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनांवर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रिंगण सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पंढरपूर तालुका पोलिसांची पथके, मदतीला अग्निशमन दलाची वाहने व स्थानिक सुरक्षा दलाची पथकेही घेण्यात आली होती. रिंगण सोहळ्यानंतर पंढरपूर जवळ येत असल्याचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. रिंगण सोहळ्यानंतर झपझप पावले टाकत वैष्णवांच्या मेळ्याने वाखरीकडे प्रस्थान ठेवले. सोमवारी सायंकाळी शेवटचा मुक्काम वाखरी येथे होणार आहे. ------------------------------पारंपरिक खेळरिंगण सोहळ्याअगोदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. रिंगण सोहळा पार पडण्याच्या काही वेळ अगोदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी मनोरे उभे करून फुगड्या खेळून, चुळचुळ मुंगळा पळी पळी तेल आदी पारंपरिक खेळ खेळून वारकऱ्यांनी एकमेकांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रिंगण सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी आलेल्या भाविकांचाही उत्साह वाढत होता.---------------------------रांगोळीच्या पायघड्यातुकोबांचे उभे रिंगण लावण्याअगोदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाल रंगाच्या दोन रेषा मारण्यात आल्या होत्या. मध्यभागी आकर्षक पांढऱ्याशुभ्र रंगाच्या रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे रिंंगण सोहळ्याला उपस्थित असणारे वारकरी व भाविकांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला होता.
पंढरीसमीप वैष्णव दंगले रिंगणी
By admin | Updated: July 8, 2014 00:57 IST