पंढरपूर : देशात निर्मलग्राम अभियानात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. लवकरच गावांपाठोपाठ संपूर्ण राज्य निर्मलग्राम होणार असून, याचा सर्वप्रथम मान कोल्हापूर जिल्ह्याला मिळणार आहे. यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे ते पंढरपूर स्वच्छता दिंडी काढण्यात आली होती. स्वच्छता दिंंडी व ग्रामसभा दिंडीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री आ. लक्ष्मणराव ढोबळे, आ. भारत भालके, आ. दीपक साळुंखे, जि.प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, नगराध्यक्षा उज्वला भालेराव, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. झेंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, उपाध्यक्ष सुभाष गुळवे, सभापती पुष्पा जाधव, उपसभापती विष्णू बागल, गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे, माऊली हळवणकर, संतोष सुळे, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड आदी उपस्थित होते.शौचालय बांधण्यासाठी शासन प्रत्येकाला ९१०० रूपये अनुदान देत आहे. निर्मलग्राम मध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकणात चांगली प्रगती आहे परंतू विदर्भ, मराठवाडा भागात चांगली स्थिती नाही, तेथे अधिक लक्ष दिले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. लोककलेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. पाणीपुरवठा व ग्रामविकास विभागाच्या वतीने प्रभावी जनजागृतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याला यश येत असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.पालकमंत्री सोपल म्हणाले, लोककलावंताच्या माध्यमातून या सोहळयातील भाविकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न लोककलावंत करतात. घर तेथे शौचालय हा कार्यक्रम शासनाचा न राहता तो लोक चळवळीतून उभारला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. संपूर्ण देशात महाराष्ट्राचा स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचा क्रमांक पहिला असून जलस्वराज्य टप्पा - २ साठी संपूर्ण देशात महाराष्ट्राची निवड जागतिक बॅकेने याच निकषावर केली असल्याचेही सोपल यांनी सांगितले.---------------------राज्याला तीन कोटींचा पुरस्कारग्रामविकासमंत्री जयंत पाटील म्हणाले की, शासनाचे उपक्रम, योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या दिंडीतील कलाकारांनी केलेले आहे. लोककला ही अतिशय प्रभावी माध्यम आहे. स्वच्छता अभियान व निर्मल अभियान यामध्ये राज्याचे देशात योगदान महत्वाचे आहे. यामुळे पंचायत राज्य व्यवस्थेचा ग्रामविकास विभागाला केंद्र शासनाचा ३ कोटी रुपयाचा पुरस्कार राज्याला मिळाला.
गावांपाठोपाठ आता महाराष्ट्र निर्मलग्राम
By admin | Updated: July 10, 2014 01:22 IST