पंढरपूर : महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून वाचव, पाऊस पडू दे, पेरण्या होऊ दे आणि बळीराजाची मेहनत यशस्वी होऊ दे, अशी प्रार्थना राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पंढरपुरात श्री विठ्ठलचरणी केली. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा बुधवारी पहाटे चार वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसोबत श्री विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान वारकरी राम शेळके, त्यांच्या पत्नी प्रमिला शेळके व मुलगा संगमेश्वर यांना मिळाला. शेळके हे नंदीबिजलगाव (ता. औराद, जि. बीदर) येथील आहेत. यावेळी राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पालकमंत्री दिलीप सोपल, पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, जि. प. अध्यक्षा निशिगंधा माळी, चंद्रकांत बागल, मंदिर समिती सदस्य वसंत पाटील, अरविंद नळगे, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार गजानन गुरव, मुख्याधिकारी शंकर गोरे, मंदिर समितीचे व्यवस्थापक एस. एस. विभुते उपस्थित होते. वारीला अनेक वर्षांची परंपरा असून पूजा करण्याचा मान मिळाला, हे माझे भाग्य समजतो. आषाढी वारीला आल्याबरोबर पावसाने सुरुवात केली. अवघ्या महाराष्ट्रात पाऊस चालू असल्याचे रिपोर्ट आले. तमाम जनतेला सुख मिळावे व भरभराट होण्यासाठी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावेत, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात गो-हत्याबंदी कायदा झाला असला तरी सर्व समाजाशी चर्चा करून येत्या १५ दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. प्रास्ताविक विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पूजेचा मान मिळालेल्या वारकरी शेळके कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.
बळीराजाच्या कष्टाला यश दे!
By admin | Updated: July 10, 2014 01:29 IST