सोलापूर : आम आदमींना नेहमी त्रास देत शहरातील शांतता आणि सुव्यवस्थेला सुरुंग लावण्याबरोबर गुन्ह्यांची मालिका चालविणाऱ्या फौजदार चावडी हद्दीत ५ अट्टल गुन्हेगारांना सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. नागेश शिवाजी महानूर (वय २४, रा. क्रांती नगर झोपडपट्टी, दमाणी नगर), शंकर अंबादास बनसोडे (वय ३२), सुधाकर कुमार कांबळे (वय २८, दोघे रा. उत्तर कसबा, पत्रा तालीम), सादिक गुडूसाब शेख (वय २४, रा. चमन शहावली टेकडी, सिद्धेश्वर पेठ) आणि रघुनाथ शंकर कोळेकर (वय २९, रा. चौपाड, उत्तर कसबा) अशी सोलापूर जिल्ह्यातून तडीपार झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. आम आदमींना त्रास देणे, जबरी चोऱ्या करणे, दरोडा घालणे, मारामारी करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, खंडणी मागण्याचे प्रकार करणे आदी प्रकारांमुळे फौजदार चावडी हद्दीतील शांतता धोक्यात आली होती. त्यांच्याविरुद्धच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठवून देण्यात आला. पोलीस आयुक्तांनी पहिल्या दोन आरोपींना दोन वर्षांकरिता आणि इतर तिघांना तीन महिन्यांकरिता तडीपार करण्याचे आदेश दिले. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. (गुन्हे) बाळकृष्ण साळुंके, डी. बी. पथकाचे प्रमुख एस. के. खटाणे, पथकातील राजकुमार तोळणुरे, आप्पा पवार, मच्छिंद्र जाधव, बंडू पवार, धनंजय सुरवसे, लक्ष्मण खरात, संजय गुरव, दिलीप चौगुले, सुरेश जमादार, रोहन ढावरे, शीतल शिवशरण, दादासाहेब सरवदे, विनोद रजपूत आदींनी ही कामगिरी केली.------------------------इतरांवरही कारवाई व्हावीआम आदमींवर दहशत बसवणे, किरकोळ आणि गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणे हे शांततेच्यादृष्टीने घातक आहे. फौजदार चावडी पोलिसांच्या विशेष पथकाने तडीपारीची जी कारवाई केली, तशी कारवाई इतर पोलीस ठाण्यांमधील गुन्हेगारांवर करण्याची मागणी होत आहे.
पाच अट्टल गुन्हेगार झाले तडीपार!
By admin | Updated: July 2, 2014 00:52 IST