सोमनाथ वसंत झोळ (वय ३४, रा. वाशिंबे, ता. करमाळा) यांनी आपल्या मोबाइलमधील फेसबुकवर १७ मार्चला एका कंपनीची जाहिरात पाहिली. त्यामध्ये तुमच्या गुंतवणुकीच्या एकूण रकमेपैकी दिवसाला पाच टक्के रक्कम ही परतावा म्हणून ४० दिवस देणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्या कंपनीचे एमडी अजय मेहरा यानेही माहीत देत विश्वास संपादन केला. त्याने कंपनीच्या अप्लिकेशनमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केले. त्या कंपनीच्या खात्यामध्ये १७ मार्चला ५० हजार रुपये भरले. १८ मार्च रोजी पाच टक्के परतावा रक्कम म्हणून अडीच हजार रुपये मिळाले. त्याच दिवशी पुन्हा ४० हजार रुपये भरले. १९ मार्चला साडेचार हजार रुपये मिळाले. पुन्हा ५० हजार रुपये भरल्यानंतर सात हजार आले. त्यानंतर २२ मार्चला आठ हजार रुपये भरले आणि त्यानंतर परतावा मिळाला नाही. त्यानंतर प्रोसेस पेंडिंग असल्याचे दिसले. एकूण १ लाख ४७ हजार रुपये जमा केले होते. त्यातील एकूण १४ हजार रुपये परत मिळाले. २९ मार्चला अप्लिकेशन बंद झाले. त्यानंतर कंपनीच्या क्रमांकावर फोन केला. तेव्हा अजय मेहरा नावाच्या व्यक्तीकडून ५ ते ६ दिवस साइट बंद आहे. त्यानंतर रेग्युलर सुरू होईल, असे सांगण्यात आले. वारंवार कंपनीच्या क्रमांकावर फोन केला असता होळी सणापर्यंत सुटी आहे. त्यांनतर अप्लिकेशन रेग्युलर सुरू होईल. त्यानंतर फोन बंद लागत होता आणि अप्लिकेशनही बंद झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पाच टक्के परताव्यासाठी पैसे भरत गेला अन् दीड लाखाला फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:27 IST