पंढरपूर: पर्यावरणातील बदलांमुळेच दुष्काळ, मोठ्या प्रमाणावर गारपीट, अतिवृष्टी आदी आपत्ती येत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वसामान्य माणसांपर्यंत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यावरण दिंडी काढण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.पंढरपूर येथे ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या पर्यावरणविषयक जनजागृतीपर उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सत्वशीला चव्हाण, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री दिलीप सोपल, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आ. भारत भालके, आ. दीपक साळुंखे, आ. रामहरी रुपनवर, जि. प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, कल्याणराव काळे आदी उपस्थित होते. पर्यावरणातील बदलांमुळे विश्वाचे उष्णतामान वाढत आहे. यावर नियंत्रण घातले पाहिजे. केंद्र्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पेट्रोलमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु याबरोबरच झाडे लावणे, पाणी वाचविणे महत्त्वाचे आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी जलाशयामुळे मोठी समृध्दी झाली आहे. परंतु उजनीची पाणीपातळी पाहता यापुढे पाणी जपून वापरले पाहिजे. पर्यावरणामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाच्या समस्येवर मात करण्यासाठी गेल्या तीन वर्षांत शासनातर्फे सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर टँकरद्वारे पाणी देण्यात आले, जनावरांसाठी मोठ्या प्रमाणावर छावण्या सुरु करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध कलापथकांनी आपले पर्यावरणविषयक जनजागृतीपर कार्यक्रमाचे सादरीकरण केले. .
पर्यावरणाचे रक्षण आवश्यक:मुख्यमंत्री
By admin | Updated: July 10, 2014 01:07 IST