सोलापूर : पर्यायी व्यवस्था न करता सार्वजनिक शौचालयाचे पाडकाम केल्याच्या प्रकरणाचा स्मार्ट सिटीशी संबंध जोडल्याने आयुक्त विजयकुमार काळम-पाटील संतापले. महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अशोक निंबर्गी यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना काळम-पाटील यांनी मला धमकावू नका, असा शब्दप्रयोग केल्यामुळे विरोधकांनी गोंधळ केला.
महापालिकेची जुलै महिन्याची तहकूब सभा महापौर सुशीला आबुटे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सायंकाळी झाली. सभेच्या सुरुवातीस अशोक निंबर्गी यांनी प्रभाग ३४ मधील शौचालयाचे पाडकाम पर्यायी व्यवस्था न करता करण्यात आल्याबद्दल लक्षवेधी केली.
हे शौचालय कोणाच्या सांगण्यावरून पाडण्यात आले. आयुक्त स्मार्ट सिटीची चर्चा करीत आहेत तर दुसरीकडे अधिकारी बेकायदेशीरपणे कामे करीत असल्याचा त्यांनी आरोप केला. त्यामुळे आयुक्त काळम-पाटील संतापले.
स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने शौचालय पाडकामाचा संबंध येत नाही, घडल्या प्रकाराची मी चौकशी करेन, असे त्यांनी उत्तर दिले. त्यावर निंबर्गीही तावातावाने बोलू लागले. स्मार्ट सिटीचा कसा संबंध नाही. विभाग प्रमुख म्हणून तुम्ही सर्व कामांना जबाबदार आहात.
स्मार्ट सिटीची जबाबदारी वाटून द्या व कामात लक्ष घाला. स्मार्ट सिटीच्या नावावर काय चाललेय, असा सवाल केला. त्यावर आयुक्त काळम-पाटील यांनी स्मार्ट सिटीचा प्रत्येक गोष्टीशी संबंध लावलात तर मी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. यावर निंबर्गी यांनीही तितक्याच त्वेषाने उत्तर दिले. मला तोंड उघडायला लावू नका. महापालिकेत कशाच्या जीवावर काय चाललेय हे जर मी बोललो तर पाहा. यावर लागलीच आयुक्त काळम-पाटील यांनी मला धमकावू नका, असे प्रतिउत्तर दिले. यामुळे संजय कोळी, शिवानंद पाटील, नरेंद्र काळे, नागेश वल्याळ, इंदिरा कुडक्याल, पांडुरंग दिड्डी यांनी जोरजोरात बोलण्यास सुरुवात केली. यामुळे गोंधळ वाढला.
शेवटी सभागृह नेते संजय हेमगड्डी व महापौर आबुटे यांनी मध्यस्थी करून आयुक्त उत्तर देत आहेत. त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, असे म्हणत विरोधकांना शांत केले. त्यावर आयुक्त काळम-पाटील यांनी विभागीय अधिकारी रेगळ यांना याबाबत विचारणा केली. संबंधित शौचालय पाडण्याचा स्थायी सभेत ठराव झाल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्तांची परवानगी घेतली का, असा सवाल निंबर्गी यांनी केला. त्यावर रेगळ निरुत्तर झाले. पैशाची देवाणघेवाण करून सार्वजनिक शौचालय पाडले जात आहेत. सभागृहात चुकीचे विषय असून त्या आधारावर हे घडत आहे. अंमलबजावणी करताना अधिकार्यांच्या हे लक्षात येत नाही का?. त्यावर आयुक्त काळम-पाटील यांनी बुधवारी दुपारी १ वा. घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर प्रकरणावर पडदा पडला.
■ बजेटमध्ये महिला शौचालयासाठी तरतूद केली; पण शौचालये बांधली नाहीत, निधी गेला कुठे? अशी लक्षवेधी रोहिणी तडवळकर यांनी केली. हा विषय निघाल्यावर अलका राठोड, बिस्मिल्ला शिकलगार याही तुटून पडल्या. त्यावर नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांनी १0 कामे हाती घेतली होती, ३ पूर्ण झाली तर ७ ठिकाणी विरोध झाल्याचे सांगितले. अलका राठोड यांनी हे काम सारिका आकुलवार पाहत होत्या, असे सांगितल्यावर आकुलवार यांनी ६ कामे फेरटेंडर करण्यात आल्याचे सांगितले. लोक मुद्दाम विरोध करीत असतील तर पोलीस बंदोबस्तात काम करा, असे आदेश महापौर आबुटे यांनी दिले. ■ यु. एन. बेरिया यांनी एसएमटी (परिवहन उपक्रम) मध्ये चाललेल्या गोंधळावर लक्षवेधी केली. नवीन १६0 पैकी ५0 गाड्या बंद आहेत. १0 व्हॉल्व्होपैकी ७ बंद, भंगारामध्ये पॅकिंगसह नवीन पार्ट घालताना मी पकडले आहे. नव्या बसचे टायर जुन्या बसला चढविले जात आहेत, असा आरोप केला. व्यवस्थापक खोबरे आजारी असल्याने पुढील सभेत यावर चर्चा करण्याचे ठरले. आनंद चंदनशिवे यांनी कारंबा नाका येथे महामार्गाच्या कामामुळे ड्रेनेजलाईन दबल्याने ३३ अपार्टमेंट, २0 नगरांना घाण पाण्याचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनाला आणले. हेमगड्डी यांनी महामार्ग विभागाच्या चुकीमुळे हे घडल्याने त्यांच्याकडून काम करून घ्यावे, अशी सूचना केली. त्यावर आयुक्तांनी एस्टिमेट तयार करण्याच्या सूचना केल्या.
(प्रतिनिधी)