पंढरपूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाचे साजिरे रुप डोळ्यांत साठवून वारकऱ्यांसह भाविकांनी ‘जाता माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता’ असा कृतकृत्य झाल्याचा भाव मनी बाळगत गुरुवारी परतीचा मार्ग धरला. आषाढी यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी बसने आणि रेल्वेने आपला परतीचा प्रवास सुरू केला आहे. राज्य परिवहन महामंडळाने सुरुवातीपासून नियोजन करून राज्याच्या सहा विभागांतून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची सोय करून ठेवली होती. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनानेही भाविकांसाठी जादा गाड्यांची सोय केली होती. यामुळे ३ ते ९ जुलैच्या दुपारी १ वाजेपर्यंत ७९ हजार ९७५ भाविक रेल्वेने परतले असल्याची माहिती रेल्वे पंढरपूर विभागाचे मुख्य वाणिज्य अधिकारी एम. के. गोसावी यांनी दिली.राज्य परिवहन महामंडळाची शहरातील दोन्ही बसस्थानके बंद ठेवण्यात आली होती. त्याऐवजी शहराबाहेर तात्पुरती बसस्थानके तयार करण्यात आली होती. यात्रा कालावधीसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या बसस्थानकांकडे रिक्षा व इतर वाहनांनी जाण्यासाठी जादा पैसे खर्च करावे लागत होते.आषाढी सोहळ्यानिमित्त पंढरपुरात येणाऱ्या पालख्यांबरोबर गर्दी कमी आहे, असा अनेक जणांचा अंदाज असला तरी महाराष्ट्र परिवहन महामंडळावर याचा काही परिणाम झाला नाही. यावेळी बसच्या वाढीव खेपा देण्यात आल्या आहेत.त्याचबरोबर रिंगण सोहळ्याच्या ठिकाणीही बस ये-जा करीत होत्या. गेल्यावर्षी आषाढी एकादशीच्या रात्री १२ वाजेपर्यंत ६२४२ फेऱ्या तर यंदा ७२८४ फेऱ्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी द्वादशीपर्यंत ३५ हजार ४०० प्रवासी तर यावर्षी ३६ हजार ४७० प्रवासी वाहतूक झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक प्रताप सावंत यांनी दिली आहे.--------------------------रेल्वे प्रशासनानेही भाविकांसाठी जादा गाड्यांची सोय केली होती. यामुळे ३ जुलै ते बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत ७९ हजार ९७५ भाविक रेल्वेने परतले आहेत.- एम. के. गोसावी,मुख्य वा. अ., म. रेल्वे, पंढरपूर
जातो माघारी पंढरीनाथा...!
By admin | Updated: July 11, 2014 01:42 IST