मंदार गोयथळे - असगोली -एकीकडे वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकरीवर्गाची कसोटी लागत आहे, तर दुसरीकडे मात्र वातावरणाच्या बदलत्या रंगामुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असताना गुहागर तालुका कृषी कार्यालयात थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचणाऱ्या कृषी सहाय्यकाची वानवा असून, गेले कित्येक दिवस हे पद रिक्त आहे. केवळ सात कृषी सहाय्यक गुहागर तालुक्याचा भार वाहात आहेत. यामुळे अधिकच संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करणार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. तालुक्यात १२२ गावांसाठी तालुका कृषी कार्यालयाला एकूण ३६ कृषी सहाय्यकांची मागणी असताना सद्यस्थितीत केवळ ७ कृषी सहाय्यक कार्यरत आहेत. त्यामुळे २९ पदे रिक्त आहेत. या परिस्थितीत सध्या कार्यरत असलेल्या सात कृषी सहाय्यकांमध्ये प्रत्येक कृषी सहाय्यकाला सरासरी १५ गावांच्या कामाचा भार घेऊन काम करावे लागत आहे. उपलब्ध असणाऱ्या कृषी सहाय्यकांमधील काहींना वेळोवेळी प्रशिक्षण अथवा अन्य कामासाठी इतरत्र पाठविले जाते. इतर शासकीय कामाचा भारही त्यांच्यावर सोपवला जातो. त्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.बदलत्या काळात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानानुसार उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहीत केले जात असले तरी बदलत्या हवामानाचे संकटही त्याच्यासमोर ठाकल्यामुळे वेळोवेळी त्याला मार्गदर्शनाची गरज भासते. ही पदे तत्काळ भरण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी कधी पूर्ण होणार असा सवाल विचारला जात आहे.
कृषी सहाय्यक वाहताहेत कामाचा भार
By admin | Updated: February 2, 2015 00:06 IST