कणकवली : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामांचा आढावा घेण्याची गरज आहे याकडे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे शुक्रवारी लक्ष वेधले. गतवर्षी झालेल्या अनेक कामांमध्ये सध्या पाणीच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या कामांवर खर्च झालेला निधी वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यावर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस पाहता पाण्याबाबत आतापासून ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे वैभव नाईक यांनी सांगितले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेचा गांभीर्याने आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी आमदार नाईक यांनी जिल्हाधिकारयांची भेट घेऊन विविध विकासकामांबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, कणकवली तालुकाप्रमुख सचिन सावंत, रूपेश आमडोसकर, राजेश ढाके, उपतालुकाप्रमुख सुनील बोंद्रे, भगवान परब, योगेश तावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अनेक कामे निकृष्ट झाल्याने त्या कामांमध्ये यावर्षी पाणीच साचले नाही. ज्याठिकाणी कामांची आवश्यकता आहे, तेथे ही कामे प्राधान्याने न करता चुकीच्या जागी कामे केल्याने निधीचा अपव्यय झाल्याचे नाईक यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेचा गंभीरपणे आढावा घेण्यात येणार आहे. या अंतर्गत नव्याने कामे सुरू करण्याबाबतही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी भंडारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जलयुक्त शिवार कामांचा गांभीर्याने आढावा घेणार
By admin | Updated: December 21, 2015 00:57 IST