बचत गटाच्या माध्यमातून महिला आता विविध व्यवसायातील आव्हाने पेलू लागल्या आहेत. विविध व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिक विकास करू लागल्या आहेत. वेगवेगळी उत्पादने घेण्याचे प्रयोग करतानाच आता नफ्याचे समीकरणही चांगल्या प्रकारे जुळवू लागल्या आहेत. योग्य मार्गदर्शन मिळाले तर आम्हीही चांगलं काम करून त्यातून चांगले पैसे मिळवू शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. विविध घरगुती पदार्थ बनवून त्यांच्या विक्रीतून चांगली कमाई मिळविण्याचे कौशल्य कुवारबाव उत्कर्षनगर येथील श्री स्वामी समर्थ महिला स्वयंसहायता बचत गटाने आत्मसात केले आहे. त्यामुळेच आज या बचत गटाची उलाढाल सुमारे दीड लाखापर्यंत होत आहे.श्री स्वामी समर्थ महिला स्वयंसहायता बचत गटाची स्थापना फेब्रुवारी २००९ साली झाली. बचत गटात २० सदस्या कार्यरत आहेत. सुरूवातीपासूनच महिलांनी १०० रूपये वर्गणी काढण्यास सुरूवात केली. नियमित वर्गणी जमा होऊ लागल्याने आर्थिक हातभार चांगला मिळाला. या महिलांना येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे मार्गदर्शन मिळाले. प्रतिष्ठानच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षा प्राची शिंदे यांचे सहकार्य लाभत असल्याने आज या महिला वेगवेगळी उत्पादने बनवत आहेत. प्रतिष्ठानच्या विक्री व प्रदर्शनातून सहभाग घेत असल्याने त्यांच्या पदार्थांची विक्रीही चांगल्या दराने होत आहे. बचत गटाच्या अध्यक्षा स्वाती वारंग महाराष्ट्र इंडस्ट्रियल, कोल्हापूरतर्फे त्या इतरही महिलांना विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देतात. या बचत गटाच्या सदस्यही आता विविध मसाले, लोणची, पापड, फेण्या, अगरबत्ती, साबण, लोकरीच्या वस्तू, शिवणकाम, मेणाच्या वस्तू याबरोबरच खाद्यपदार्थ बनवून त्याच्या विक्रीतून रोजगार मिळवू लागल्या आहेत. दिवाळीच्या कालावधीतही विविध खाद्यपदार्थांची विक्री या महिला करतात. १५००० रुपयांपर्यंत अंतर्गत कर्ज घेतानाच त्याची परतफेड नियमितपणे करण्याची स्वयंशिस्त या महिला पाळतात. बचत गटातून २ टक्के रक्कम उचलून त्यातूनशाळांमध्ये शालेय पोषण आहार बनवून देण्याचाही व्यवसाय या महिलांनी केलेला आहे. स्टॉल हेच या महिलांचे मार्केटिंग आहे. यावर्षी बचत गटाने विविध मसाल्यांच्या उत्पादनातून सुमारे लाखभर रूपये उत्पन्न मिळविले.श्री स्वामी समर्थ महिला स्वयंसहायता बचत गटाच्या २० सदस्या आहेत. त्यात अध्यक्ष स्वाती वारंग यांच्यासह श्रध्दा मांजरेकर, संपदा गोठिवरेकर, उल्का पाटील, दीप्ती भोसले, आदिती प्रभू, प्रिया लाड, चेतना पाटील, सुजाता पिलणकर, नीलिमा मयेकर, श्रद्धा पारकर, स्मिता तोडणकर, प्रेमा पेडणेकर, सायली पिलणकर, ऐश्वर्या बिर्जे, श्वेता घडशी, चेतना पोटफोडे, रजनी दांडेकर, प्रणिता पाडावे, संगीता पानकर यांचा समावेश आहे. आज या महिला स्वत:च्या बचतीतून व्यवसायासाठी रक्कम उभी करतात. आजपर्यंतच एवढा डोलारा केवळ त्यांच्या बचतीतून आणि व्यवसायातून मिळालेल्या रकमेवर त्यांनी उभारला आहे. विशेष म्हणजे बँकेने देऊ केलेली मदतही त्यांनी नाकारून आज स्वबळावर हा बचत गट चालवीत आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे त्यांना विक्रीसाठी सहकार्य होते. प्रतिष्ठानतर्फे विविध ठिकाणी होणाऱ्या बचत गटांच्या प्रदर्शनात या महिला उत्साहाने भाग घेतात. यातून त्यांच्या उत्पादनाची चांगल्या प्रकारे विक्रीही होते. त्यामुळे हा बचत गट आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाला आहे. या उत्साहातूनच त्यांचा आत्मविश्वास वाढू लागला आहे.- शोभना कांबळेसहकार्य न करणाऱ्या बॅकेलाही नाकारले... बचत गटाच्या अध्यक्षा स्वाती वारंग सांगतात, सुरूवातीला आम्ही कर्ज मागण्यासाठी एका बँकेकडे गेलो होतो. मात्र, त्या बँकेने आम्हाला सहकार्य केलेच नाही, उलट आमच्यावरच अविश्वास दाखवला. तीन फेऱ्या वाया गेल्या. आता कर्जच नको म्हणून गेली सहा वर्षे आम्ही आमच्यातूनच व्यवसायासाठी पैसा उभा केला. परत आम्ही बँकेकडे गेलोच नाही. मात्र, आता आमची आर्थिक उलाढाल चांगली होऊ लागल्याचे समजताच बँक आमच्याकडे आली होती. पण, आम्हीच बँकेची मदत नाकारली. आता आम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच डबे पोहोचविण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय केला तर आमच्या बचत गटाबरोबरच इतरही बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, असा मानसही वारंग व्यक्त करतात.
बचतीच्या रकमेतूनच उभारले विविध व्यवसाय
By admin | Updated: January 9, 2015 00:02 IST