रत्नागिरी : शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे आंबा विक्रीस पाठवल्यानंतर शासन निर्णयानुसार दलाली केवळ सहा टक्केच घेण्यात यावी. परंतु, १० टक्के दलाली घेण्यात येत असल्याने, ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघातर्फे व्यापाऱ्यांकडे करण्यात येणार आहे. याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे.मराठा भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या आंबा उत्पादकांच्या बैठकीत संबंधित निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. कॅनिंगच्या दरामध्ये नेहमी चढउतार असतो. परंतु कॅनिंगचा दर शेवटपर्यंत स्थिर रहाणे आवश्यक आहे. याकरिता संघाने कमिटी स्थापन करावी. बाजार दरावर परिणाम करणाऱ्या कॅनिंग कंपनीच्या प्रतिनिधींना त्यामध्ये सहभागी करुन घेऊन दर निश्चित करण्यात यावेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन बाजार समितीच्या आवारातच कॅनिंग आंब्याची खरेदी-विक्री व्हावी.आंब्याच्या हंगामामध्ये वाहतूकदारांनी कोणत्याही प्रकारचा संप करुन शेतकऱ्यांची गैरसोय करु नये. यासाठी वाहतूकदारांशी आंबा उत्पादक संघ चर्चा करणार असून, तसे निवेदनही सादर करणार आहे. या वेळी बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी झालेल्या बैठकीस डॉ. विवेक भिडे, मंदार सरपोतदार, तुकाराम घवाळी, उमर धामस्कर, अनिल पटवर्धन, हनिफ धामस्कर, प्रसन्न पेठे, हसन धामस्कर, धाडस सावंत व पदाधिकारी, बागायतदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘सहा टक्के’साठी प्रयत्न
By admin | Updated: February 2, 2015 00:08 IST