मालवण : देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही.. नवीन पोपट हा... रूपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना... अशा मराठीतील गाजलेल्या गाण्यांनी आदर्श शिंदे, वैशाली माडे यांनी रसिकांना थिरकवले, तर सिनेअभिनेत्री नेहा पेंडसे हिने नृत्याविष्काराने धमाल उडवली. महोत्सवाच्या पहिल्या रात्री ‘जल्लोष’ या संगीतनृत्याचा कार्यक्रमाने पर्यटन महोत्सवाची पहिली रात्र रंगतदार केली.मालवण बोर्डिंग मैदानावर मुंबईच्या सुरेल क्रिएशन गु्रपने ‘जल्लोष’ कार्यक्रम सादर केला. गणेश वंदनेने सुरूवात झाल्यानंतर ‘फु बाई फू’फेम अभिनेते दिगंबर नाईक यांनी मालवणी गाऱ्हाण्यातून जिल्ह्यातील पर्यटनवाढीचे साकडे घातले. यानंतर गायक आदर्श शिंदे यांची एन्ट्री रंगमंचावर झाली. ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ या सुप्रसिद्ध गाण्याने आदर्श शिंदे यांनी रसिकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या मिळवल्या. ‘तुझ्या प्रितीचा विंचू मला चावला’, ‘उर्भाटा गावाचा उर्भाटा चाळा’ आदी एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली. आदर्श शिंदे यांच्या गाण्यावर रसिकांनी ठेका धरलेला असताना आनंद शिंदे-प्रल्हाद शिंदे जोडीच्या गाजलेल्या गाण्यांची फर्माईश करण्यात आली. तेव्हा ‘नवीन पोपट हा’ हे गाणे सादर करत रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाची रंगत वाढवताना गायिका वैशाली माडे हिने ‘ऐका दाजिबा’, ‘रूपेरी वाळूत माडांच्या बनात’ आदी मराठी गाण्यांसह हिंदी गाण्यांचा तडका दिला. वैशालीने रसिकांमध्ये जात गाण्यांच्या ठेक्यावर नाचायला लावले. यानंतर सिनेअभिनेती नेहा पेंडसे आणि नृत्यांगना संस्कृती बलुगडे यांच्या नृत्याविष्कारावर रसिकांनी ताल धरला. मराठी रॉकस्टार पुष्कर जोग याने आपल्या नृत्यातून धमाल उडवून दिली. जोग याने टाईमपास चित्रपटातील ‘ही पोरगी साजूक तुपातली’ या गाण्यासह ‘बघतोय रिक्षावाला’, ‘राधा तेरी चुनरी’ आदी गाण्यांवर नृत्याविष्कार सादर केले. ‘फू बाई फू’ फेम दिगंबर नाईक, कुशल बद्रिके, अतुल तोडणकर, सुहास परांजपे या विनोदवीरांनी आपल्या स्कीटमधून हास्याचे कारंजे उडवले. सुरेल क्रिएशन गु्रपच्या प्रमुख मानसी इंगळे यांच्यासह कलाकारांचा जिल्हाधिकारी ई.रविंद्रन, आमदार वैभव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)माहेरी आल्याचा भास : वैशाली माडे पर्यटन महोत्सवानिमित्त जल्लोष कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गात आलेल्या ‘सारेगम’फेम सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे हिने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निळाशार समुद्र, हिरवीगार वनराई पाहून मी भारावले आहे. कोकणात आल्यावर येथील माणसांना भेटून आपल्या हक्काच्या माहेरात आल्याचा भास होतोय, असे उद्गार काढले. यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.
गायन, नृत्याविष्काराने ‘जल्लोष’
By admin | Updated: January 30, 2015 23:11 IST