राजापूर : सन २०३०पर्यंत बायोडिझेलचे उत्पादन ३० टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट जगासमोर असल्यामुळे या बायोडिझेलसाठी लागणारी समुद्री शेवाळाची शेती भविष्यात राजापूर तालुक्याच्या किनारपट्टीवर चांगलीच बहरेल, असा विश्वास पुणे येथील भारती विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. बी. बी. चौगुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे. कोकण किनारपट्टीवरील वातावरण या समुद्री शेवाळाच्या शेतीसाठी पोषक असून, भविष्यात ही किनारपट्टी जगाला इंधन पुरविणारी ठरु शकते, असेही मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे. राजापूर तालुक्याच्या किनारपट्टी भागात खारलँडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. समुद्राची पातळी वाढत चालल्यामुळे या भागातील शेतीच्या जमिनी नापीक होण्याचा धोका वाढला आहे. समुद्राचे खारे पाणी शेतजमिनीत घुसू लागल्यामुळे खारलँडचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाची किंमत वाढत आहे. आगामी काळात पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी बायोडिझेल हा एकमेव पर्याय जगासमोर आहे. जगाची वाढती लोकसंख्या पाहता सन २०२०पर्यंत अन्नधान्याची कमी भरुन काढण्यासाठी सुमारे १९ टक्के अधिक जमीन लागवडीखाली आणण्याचे जागतिक उद्दिष्ट असल्याचेही डॉ. चौगुले यांनी सांगितले. प्रारंभी पूर्ण विद्यापीठामध्ये वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉ. बी. बी. चौगुले यांनी राजापूर तालुक्यातील अणसुरे, मिठगवाणे, जानशी, केळशी या गावांना भेट दिली. येथील शेवाळांच्या विविध जातीचा अभ्यास करण्यासाठी आपले संशोधन सुरू केले आहे. खारलॅडचे जास्त प्रमाण असणाऱ्या या गावांना भेटी दिल्यानंतर ते लोकमतशी बोलत होते. आज या भागात मोठ्या प्रमाणात कोळंबी शेती केली जात असली तरी ‘व्हाईट व्हायरस’ या रोगामुळे हे कोळंबी प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जागतिक पातळीवर व्हाईट व्हायरस हा मत्स्यशेतीशी निगडीत असणारा रोग सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. आपण या संपूर्ण भागाची पाहणी केली असून, येथील उपलब्ध शेवळाच्या जाती जमा केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. राजापूर तालुक्यातील समुद्र किनारे फारच स्वच्छ असून, येथील वातावरणही खूपच चांगले आहे. त्यामुळे भविष्यात हा भाग बायोडिझेलसाठी जगाचे लक्ष ठरणारा असू शकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आज ‘व्हाईट व्हायरस’मुळे बंद पडत असलेले कोळंबी प्रकल्पाचे प्लॉट भविष्यात चांगल्या प्रकारे शेवाळ शेतीसाठी उपयोगी ठरु शकतात. शिवाय एक हेक्टर खारलॅड जमिनीमध्ये घेतल्या जाणाऱ्या शेवाळामधून सुमारे तीस हजार लीटर बायोडिझेल मिळू शकते. त्यामुळे भविष्यात या भागातील जनतेसाठी चांगल्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असेही त्यांनी बोलताना स्पष्ट केले. बायोडिझेल हे मोगली एरंडापासूनही मिळविले जाते. मात्र, अन्नधान्याच्या उपलब्धतेसाठी तो पर्याय परवडणारा नाही. त्यामुळे जागतिक पातळीवर खाऱ्या पाण्याची उपलब्धता जास्त असल्यामुळे समुद्री शेवाळ हा एकमेव पर्याय बायोडिझेलसाठी उरला आहे. त्यामुळे राजापूरची किनारपट्टीची गावे बायोडिझेलची गावे ठरु शकतील व या भागाची प्रगती झपाट्याने होत जाईल, असे डॉ. चौगुले यांनी लोकमतला सांगितले. त्यातच शेवाळ हे वातावरणातील कार्बन मोठ्या प्रमाणात शोषून घेत असल्यामुळे ते पर्यावरण रक्षकही आहे. त्यामुळे समुद्री शेवाळाच्या शेतीमुळे कोणत्याही प्रकारची पर्यावरणाची हानी होणार नाही. उलट या भागात उपलब्ध असलेले खारलँडचे क्षेत्र पाहता या भागात अॅक्वाकल्चर, बायोडिझेल व खाडी भागात समुद्रीशेवाळाची लागवड असे उद्योग चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ शकतात, असेही चौगुले यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
बायोडिझेलसाठी शेवाळी शेतीची संधी
By admin | Updated: February 2, 2015 00:05 IST