रत्नागिरी : पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या कामांचा आढावा घेतल्यानंतर अपेक्षाभंग झाल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेतून पहिल्या टप्प्यात २७००पैकी केवळ ८८ किलोमीटर्सचे रस्ते झाले. तत्कालिन केंद्रीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे हे घडले असून, आता केंद्रातील आमचे एनडीएचे सरकार या दोन्ही जिल्ह्यांवर झालेला अन्याय या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात दूर करेल, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी दिली.महामार्ग चौपदरीकरणासाठीच्या प्रारंभिक कामांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर राऊत पत्रकारांशी बोलत होते. राज्यात भाजपा सरकार स्थापन झाले. मात्र, सेनेला सहभाग मिळालेला नाही, याबाबत विचारता ते म्हणाले, भाजपबरोबर चर्चा सुरू आहे. केंद्रात दोघांना मंत्रिपदाची आॅफर दिली आहे. त्याबाबत विचारता याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच घेतील, असे ते म्हणाले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्खननावर असलेली बंदी उठविण्यात यश आले होते. मात्र, त्याला उच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. केंद्रीय पातळीवर याप्रश्नी पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
ग्रामसडक योजनेत रत्नागिरीचा अपेक्षाभंग
By admin | Updated: November 7, 2014 23:31 IST