खाडीपट्टा : खेड तालुक्यातील भागातील बहुतांश भातशेतीवर करपा व कीडीचा प्रादुर्भाव होऊन भातपिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच परतीच्या पावसामुळे भातशेती आडवी पडलेली असताना रानडुकरांनी त्याची नासाडी केली आहे. मात्र, रोगाने आणि करप्याने बाधित झालेल्या भातशेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे न झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर भरपाईपासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्रफळाचा आकडा वरिष्ठ कार्यालयाकडे तालुका कृषी कार्यालयाकडून पाठवला जातो. मात्र, ग्रामीण भागातील ज्यांचा उदरनिर्वाह केवळ शेतीवरच अवलंबून आहे, अशा गरीब शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. अद्याप ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांना कृषी कार्यालय, तलाठी अगर ग्रामपंचायतीकडे तक्रार करुन शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तक्रार कशी करावी, याची माहिती नसल्याने या बाधित क्षेत्राकडे कोणाचेही लक्ष नाही किंवा याची कोणत्याच यंत्रणेने दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पिकाची आशा सोडून केवळ जनावरांसाठी पेंढा मिळावा म्हणून त्या पिकाची कापणी केली असल्याची कैफियत खाडीपट्टा भागातील कर्जी, तळघर, अणस्पुरेतील शेतकऱ्यांनी मांडली. (वार्ताहर)आता भ्रांत वर्षभराची... एकीकडे कृषी विभागाने बऱ्याच ठिकाणी औषध फवारणीसाठी आवाहन केले आहे. मात्र, फवारणी न झाल्याने या भागात ही समस्या निर्माण झाली आहे. त्यातच याची नुकसान भरपाई शासनाकडून मिळण्याची आवश्यकता असल्याने वर्षभराच्या उदरनिर्वाहाची भ्रांत पडून राहिली आहे. याकडे तालुका कृषी कार्यालयाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.कृषी अधिकारी अद्याप नुकसानग्रस्त भागात फिरकलेले नाहीत. मात्र मंडळ अधिकारी यांनी मुंबके ग्रामपंचायतीच्या हद्दितील एका शेतकऱ्याच्या भातशेतीची पाहणी केली व नंतर परिसरातील भातशेतीची नुकसानीची पाहणी करुन पंचनामे करणार असल्याचे मंडळ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.- अकबर दुदुके - सरपंच, मुंबकेतालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी शेतीच्या नुकसानाची अद्याप कोणतीही पाहणी केलेली नाही किंवा महसूल खात्यानेही नुकसानाचे कोणतेही पंचनामे केलेले नाहीत. त्यामुळे भरपाई कशी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे. - मुश्ताक तांबे - सरपंच, कर्जी