मालवण : पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा सागरी महामार्ग दोन-तीन वर्षात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग ु रायगड यांपैकी रत्नागिरीला प्रथम निधी देऊन रत्नागिरी-गोवा सागरी महामार्ग पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली. तसेच मार्चमध्ये कुवेत दौऱ्यात दोन देशांच्या समन्वयाने धोरण ठरवून हेल्थ टुरिझमचा पहिला प्रकल्प सिंधुदुर्गात आणणार असल्याची घोषणा त्यांनी केली. जिल्हा नियोजन समिती, यूएनडीपी, एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणात सुरू असलेल्या सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवाचा सांगता सोहळा राज्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर, एमटीडीसीचे अधिकारी दीपक माने, निवासी उपजिल्हाधिकारी खुटवड उपस्थित होते. मंत्री शिंदे म्हणाले, पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सिंधुदुर्ग महोत्सवासारखे इव्हेंट होणे गरजेचे आहेत. महोत्सवाला येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीवर जी बैठक घेतली त्यात पर्यटनाविषयी धोरण आखले आहे. केंद्रात व राज्यात तुम्ही परिवर्तन घडविले आहे. त्यामुळे या उपलब्धीचा वापर करण्यासाठी काही अंशी कायद्यात बदल करावा लागल्यास तोही करू. या भागात पर्यटन व्यावसायिकांचे जे प्रश्न आहेत त्यावर तोडगा काढून येथील पर्यटनला चालना द्यायची आहे. ते म्हणाले, जिल्ह्याचा विकास पर्यटनातून करावयाचा असेल तर स्थानिकांचा पर्यटन उपक्रमांमध्ये सहभाग वाढविणे आवश्यक आहे. येथील निवास न्याहारीधारकांच्या अनेक समस्या आहेत. पर्यटन व्यवसाय हा काही महिन्यांपर्यंत मर्यादित असतो. मात्र, निवास न्याहारीधारकांना व्यावसायिक दराने विजेची आकारणी करण्यात येते. स्थानिकांनी पर्यटकांना सुविधा देण्यासाठी घराघरात निवास न्याहारी योजना सुरू केल्याने त्यांना करातून सूट मिळणे आवश्यक आहे. तोंडवळी-वायंगणी येथे १२०० कोटींचा सी-वर्ल्ड प्रकल्प साकारणार असेल तर त्या गावापर्यंत जाणारे रस्ते सुसज्ज झाले पाहिजेत. जिल्ह्यात येणाऱ्या लाखो पर्यटकांपैकी बहुतांश पर्यटक तारकर्ली, देवबाग, वायरी या भागाकडे वळतात. मात्र, तेथे जाणारे रस्ते खूपच अरूंद आहेत. पर्यटकांना तारकर्ली- देवबागपर्यंत विनासायास जायचे असेल तर पर्यायी मार्गाचा विचार करण्यात येऊ शकतो, असेही केसरकर म्हणाले. जिल्ह्यात सिंधुदुर्ग, विजयदुर्ग हे ऐतिहासिक किल्ले पुरातत्व विभागाकडे आहेत. या ठिकाणी स्थानिकांना पर्यटन व्यवसाय करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे स्टॉल उभे करता यावेत, यासाठी राज्य सरकारने केंद्रीय पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे केसरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सागरी महामार्ग लवकरच पूर्णत्वास
By admin | Updated: February 1, 2015 00:38 IST