कसई दोडामार्ग : नारदाच्या गादीवर उभा राहून कीर्तन करणे ही कला आहे. किर्तनामधून ज्ञानाचे भांडार खुले होेते. किर्तनकार स्वत: घडवितो आणि दुसऱ्याला ज्ञान देऊन उत्कृष्ट कीर्तनकार घडवितो, हीच खरी समाजसेवा आहे. ही कला जोपासणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन साई मठाचे अध्यक्ष व संत दादा साई यांनी वझरे येथे कीर्तन मेळाव्याप्रसंगी केले. वझरे येथे भव्य बाल कीर्तन महोत्सव नुकताच झाला. कै. लक्ष्मण वझे व कै. प्रभाकर वझे यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी दादा साई बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, संत कीर्तनकार सागर जावडेकर, सरपंच सागर नाईक, सुहास वझे, मंगेश माणिक, यशवंत आठलेकर, रंगनाथ गवस, बाळू गवस, बाबुराव शिरोडकर, एकनाथ गवस, केशव वझे, सत्यवान गवस, काशिनाथ वझे, केशव वझे, वैभव वझे, गुरुदास दामले, शिवाजी वझे, प्राची दामले, गौरी दामले, मनोज वझे आदी उपस्थित होते.यावेळी दादा साई पुढे म्हणाले की, एक काळ किर्तनाला महत्त्व होते. किर्तन ऐकण्यासाठी भक्तांची गर्दी व्हायची. मात्र, आता किर्तनासाठी गर्दी होत नाही. कलियुग असल्याने लोकांची पसंती आॅर्केस्ट्रा, सिनेमा, नाचगाणी आदी गोष्टींंना मिळत आहे. किर्तन कला जिवंत ठेवण्यासाठी असे किर्तन महोत्सव आयोजित करणे हा एकमेव उपाय आहे. ज्ञानाचे भांडार असते. ते परिपूर्ण असते. आपल्याकडे हे ज्ञानाचे भांडार दुसऱ्यांना देण्यासाठी धडपड सुरू असते. ही कला जिवंत ठेवण्यासाठी सुहास वझे प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर सर्वांनी एकत्र येऊन किर्तन कला अखंड ठेवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दादा साई यांनी केले. सागर जावडेकर म्हणाले, किर्तनकाराच्या अंगी ज्ञानाचे अफाट सामर्थ्य असते. ते सर्व समावेशक असते. किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करत असतो. किर्तन रसिकांना मंत्रमुग्ध करते. किर्तनकार आपल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्याचे ज्ञान द्विगुणीत करण्यासाठी करतो. त्यामुळे ही समाजसेवाच आहे, असे सांगितले. (वार्ताहर)
किर्तनातून दुसऱ्याला ज्ञान मिळेल
By admin | Updated: December 29, 2014 00:07 IST