सुनील गोवेकर - आरोंदा -निसर्ग सौंदर्याने नटलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झालेला असतानाही पर्यटनदृष्ट्या पूर्णपणे विकसित झालेला नाही. किंबहुना पर्यटन स्थळांच्या विकसित करण्याकडे दुर्लक्षच केला जात असल्याचे दिसून येत आहे. तळवणे येथील बटकीची तळी हे स्थळ त्यातीलच एक आहे. ही तळी म्हणजे निसर्गसौंदर्याचा अप्रतिम आविष्कार आहे. या ऐतिहासिक स्थळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात काही पर्यटन स्थळे अशी आहेत की, ती विकासापासून वंचित राहिलेली आहेत. सद्यस्थितीत या तळीत गाळ साचलेला असून तो उपसा करण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. लोकवस्तीपासून काही अंतरावर असणारी ही बटकीची तळी व त्यासभोवताचा असणारा परिसर हा मनोवेधक आहे. या तळीबाबत असे सांगितले जाते की, ही तळी पांडवकालीन असून पांडवांनी तळी खोदण्याचे काम एका रात्रीत केले आहे. यामागील इतिहासाचे पुरावे मिळत नसले तरी येथील ज्येष्ठांनी ही तळी पांडवकालीन असल्याचेच सांगितले आहे. त्यामुळे या तळीला महत्त्व प्राप्त होत आहे. या स्थळाचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास पर्यटकांसाठी हे खास आकर्षण ठरू शकेल. मात्र, कोणताही निधी मिळत नसल्याने ही तळी दुर्लक्षित राहिली आहे. तसेच इतरही साफसफाई करण्याची गरज आहे. या बटकीच्या तळीजवळ असणारे पांडवकालीन गोरक्ष गोठणदेव मंदिर हेही या परिसराचे निसर्गसौंदर्य वाढविते. हे मंदिर गाव पंचायतनापासून अलिप्त असून ग्रामस्थांच्या सहकार्यातून या मंदिराची देखभाल केली जाते. या ठिकाणी वार्षिक पूजा करण्याची परंपरा असून ग्रामस्थांची या देवस्थानावर फार मोठी श्रध्दा आहे. पांडवकालीन असलेली ही बटकीची तळी आणि त्याच्या अवतीभवतीचा हा सारा निसर्गाने बहरलेला परिसर हा पर्यटकांसाठी भुरळ घालणारा आहे. देशी विदेशी पर्यटकांसाठी हे स्थळ नक्कीच आकर्षणाचे ठरु शकते. मात्र, त्यासाठी या स्थळाच्या स्वच्छतेसह देखभाल दुरुस्तीचीही आवश्यकता आहे. या पसिसराकडे होणारे दुर्लक्ष पर्यटनदृष्ट्या मारक ठरत आहे. या परिसरातील पर्यटन स्थळ सर्वांच्या दृष्टीपथास आल्यास यामुळे रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत, हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे हा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांसह इतिहासप्रेमींकडूनहीहोत आहे.
तळवणेतील पांडवकालीन तळीकडे दुर्लक्ष
By admin | Updated: November 4, 2014 00:23 IST