संकेत गोयथळे - गुहागर -विधानसभा निवडणुकीत यावेळी एकूण १ लाख ५१ हजार ४८७ मतदान झाले. यामध्ये गत विधानसभा निवडणुकीपेक्षा ९८२७ मते वाढली आहेत. गतवेळी १० उमेदवार विधानसभेला होते. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व शिवसेना उमेदवारवगळता अन्य सात उमेदवारांना झालेले १९३२१ मतदान कोणाच्या पारड्यात पडते, हा औत्सुक्याचा विषय आहे.मागील विधानसभा निवडणुकीत एकूण १० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यावेळी १ लाख ४१ हजार ६६० मतदान होऊन राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांना ५२ हजार ९२९, शिवसेनेचे रामदास कदम यांना ३९ हजार ९५९, श्रीधर सेनेचे विनय नातू यांना २९ हजार ४४१, वैभव खेडेकर (मनसे) ६८४९, सुरेश सावंत (आरपीआय) ३७६४, उदय पवार (बसपा) २४७२, प्रमोद आंब्रे (अपक्ष) ७४०, एकनाथ सकपाळ (अपक्ष) १२३२, श्रीकांत कदम १७२१, सदानंद पवार (अपक्ष) यांना २५४३ मते मिळाली होती. यामध्ये भास्कर जाधव, रामदास कदम, विनय नातू आघाडीचे तीन उमेदवारवगळता अन्य सात उमेदवारांना १९ हजार ३२१ मते मिळाली. यावेळी संपूर्ण स्थिती वेगळी आहे. पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रवादीतर्फे भास्कर जाधव यावेळीही कायम आहेत, तर शिवसेनेतर्फे विजयकुमार भोसले, भाजपातर्फे विनय नातू, आघाडी तुटल्याने काँग्रेसचे उमेदवार संदीप सावंत व बसपातर्फे सुरेश गमरे आहेत. बसपाची मागील निवडणुकीतील एक हजार मते कायम राहिल्यास अन्य १८ हजार मते चौघांमध्ये कशा प्रकारे विभागली जातात, याचे औत्सुक्य आहे.मागील निवडणुकीत युती विभाजनामुळे भास्कर जाधव निवडून आले. रामदास कदम व नातू यांची एकत्रित मते ६९ हजार ४०० मधून भास्कर जाधव यांना मिळालेली ५२ हजार ९२९ मते वगळल्यास युती म्हणून १६ हजार ४७१ मतांची आघाडी होती. मागील विधानसभा निवडणुकीचा विचार करता मनसेचे वैभव खेडेकर हे ६८४९ मते घेऊन चौथ्या नंबरला होते. यावेळी गुहागर मतदार संघात मनसेचा उमेदवार नसल्याने नोटाचा वापर करणार असल्याची भूमिका गुहागरचे तालुकाध्यक्ष राजेश शेटे यांनी जाहीर केली. असे असले तरी ही मते आपल्याला मिळतील, असा शिवसेना दावा करत आहेत. मागील निवडणुकीमध्ये मनसेची काही मते राष्ट्रवादीकडे वळल्याची चर्चा होती. यावेळी पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी भास्कर जाधव यांच्या प्रयत्नांना किती यश येते, यावर राजकीय गणित उलटसुलट होऊ शकते. पाचव्या क्रमांकाला सुरेश सावंत यांनी ३७६४ मते घेतली होती. सुरेश सावंत आजच्या स्थितीला उपसभापती असून, भास्कर जाधव समर्थक आहेत. तरीही आरपीआय भाजपाबरोबर असल्याने यातील किती मते राष्ट्रवादीकडे वळविण्यात सावंत यांना यश येते, यावर राजकीय गणित ठरेल. यावेळी ७४७ नवमतदारांची नोंद झाली आहे, तर ९८२७ एवढे जास्त मतदान झाले आहे. जास्तीचे झालेले मतदान मोदी लाटेला आहे की, भास्कर जाधव यांच्या विकासकामांना हाही चर्चेचा विषय आहे. लोकसभेला शेकापतर्फे भास्कर जाधव विरोधक असणारे रमेश कदम यांना ८ हजार मते पडली होती. एकूणच मतदार संघाची स्थिती पाहता राजकीय बदल, विधानसभेमधील तुलनात्मक उमेदवार संख्या व लोकसभेमधील मतदान, निवडणुकीमध्ये बदललेली राजकीय स्थिती याचा विचार करता अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
--गुहागर --‘त्या’ एकोणीस हजार मतांचा मालक कोण ?
By admin | Updated: October 17, 2014 22:13 IST