गुहागर : गुहागर येथील विश्वास खरे खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना शुक्रवारी गुहागरात आणण्यात आले. हे तिघेही तिशीतील आहेत. पंचांसमक्ष आणि प्रत्यक्ष घटनास्थळी घेऊन गेल्यानंतर आरोपींनी दि. १ आॅक्टोबर २०१४ रोजी घडलेला घटनाक्रम उलगडला. केवळ सोने चोरीच्या उद्देशानेच आलो होतो. मात्र, खरे यांना आवरता न आल्याने खून झाल्याची पंचांसमक्ष कबुली दिली. या आरोपींना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता दि. १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.कासवमित्र विश्वास खरे यांचा १ नोव्हेंबर २०१४ रोजी धारदार शस्त्राने असंख्य वार करुन निर्घृण खून करण्यात आला होता. सुरुवातीला गुहागर पोलीस आणि नंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी यांच्यामार्फत याप्रकरणी तपास सुरु होता. पोलीस निरीक्षक एस. एन. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथून तीन संशयितांना ताब्यात घेतले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांना गुहागरला आणण्यात आले आणि पंचांसमक्ष त्यांचा कबुलीजबाब नोंदवण्यात आला. संशयित आरोपींपैकी एकाला घटनास्थळी नेण्यात आले.या आरोपीतील एकजण जो ड्रायव्हर आहे. काही दिवसांपूर्वी गुहागरमध्ये भाडे घेऊन आला होता. यावेळी त्याने विश्वास खरे यांचे खरे ‘प्लेझर पॉर्इंट’ हे निर्जनस्थळी असल्याचे व खरे यांच्या अंगावर नेहमी लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असल्याचे हेरले होते. दरम्यान, पुणे येथे परतल्यानंतर आर्थिक चणचणीत असलेल्या आपल्या दोघा साथीदारांना ही बाब सांगितली. त्यानंतर प्रत्यक्ष घटनेपूर्वी हे तिघेही गुहागरात खरे यांच्याकडे राहून गेले होते. त्यानंतर दागिने लुटण्याच्या मनसुब्याने दि. ३० सप्टेंबर रोजी ते पुन्हा गुहागर येथे आले. खरे यांच्या रिसॉर्टच्या अलिकडे सुमारे ७०० मीटर अंतरावरील दुर्गादेवीच्या खांबाजवळील दातार यांच्या घराच्या अंगणात त्यांनी आपली दुचाकी उभी केली. समुद्र किनाऱ्यावरील एकांत ठिकाणी असलेल्या रुमचे दार उघडून राहिले. दुसऱ्या दिवशी खरे यांनी त्यांना याबाबत सुनावले. आगाऊ भाडे देण्यावरुन किरकोळ कुरबूरही झाली. त्यानंतर खरे यांच्यावर सुरा रोखून अंगावरील दागिने काढून देण्यास धमकावले. त्यांच्या पोटात सुऱ्याने वार केला. तरीही बधत नसल्याने फडक्याने तोंड दाबून तिथेच पडलेल्या विळ्यासारख्या शस्त्राने एकाने खरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. त्यानंतर पलायन केले. हा घटनाक्रम त्यांनी पंचांसमोर कथन केला. (वार्ताहर)गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांकडून मोबाईल टेक्नॉलॉजीतील एका वरिष्ठ तज्ज्ञाचे सहकार्य घेण्यात आले. मोबाईल टॉवर ट्रेसिंगमुळे तिघा संशयितांपर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य झाले.
सोने चोरीसाठीच विश्वास खरेंना संपवले
By admin | Updated: January 10, 2015 00:24 IST