अयोद्याप्रसाद गावकर - पुरळ -लोकसभा निवडणुकीमध्ये देवगड तालुक्यामध्ये बापर्डे व फणसगाव या दोनच जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काँग्रेसला नाममात्र आघाडी मिळाली होती. मात्र सहा महिन्यांमध्येच विधानसभा निवडणुकीमध्ये नीतेश राणे यांची प्रचाराची रणनीती देवगड व्हिजनचे भवितव्य यामुळे किंजवडे व देवगड जिल्हा परिषद मतदारसंघ वगळता तालुक्यातील इतर सहाही जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसने आघाडी घेतली आहे.कित्येक वर्षांपासूनचा भाजपचा देवगड हा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यामध्ये काँग्रेसमध्ये मुसंडी मारून देवगड तालुक्यातून ४११५ मतांची आघाडी घेतली आहे. आप्पासाहेब गोगटे यांनी रूजविलेला भाजप पक्ष, त्यांची विकासकामे, माजी आमदार अजित गोगटे यांची देवगडमध्ये कामगिरी तसेच विधानपरिषदेचे आमदार भाई गिरकर व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे देवगडचे सुपूत्र असल्याने देवगडमध्ये भाजपची भक्कम मोठी ताकद होती. मात्र याच ताकदीला आमदार नीतेश राणे यांनी भगदाड पाडले आहे.भाजपची झालेली पिछेहाट ही कोकणातील चिंतेची बाब आहे. कारण कोकणातून कणकवली मतदारसंघातूनच प्रमोद जठार निवडून येणार अशी मोठी आशा भाजपा नेत्यांनी मनाशी बाळगली होती. मात्र या आशेला नीतेश राणे यांनी पूर्णविराम दिला आहे. प्रमोद जठार यांच्याबद्दलची नाराजी व काँग्रेसच्या नियोजनबद्ध प्रचारामुळे भाजपला ३० वर्षे असलेला देवगडचा गड स्वत:कडे राखता आला नाही. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या देवगड तालुक्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यात काँग्रेसला यश आले.विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेसह काँगे्रसचेच अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले विजय सावंत यांच्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक बहुरंगी झाली. त्यामुळे साहजिकच मतविभागणी होणार हे निश्चित होते. दोन मतदारसंघात तरी युती व्हावी, अशी शिवसेना- भाजपा पक्षातील नेत्यांची इच्छा होती. मात्र तसे झाले नाही. काँग्रेसला आघाडी असो वा नसो याचा फरक काहीही पडणार नसल्यामुळे काँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात उतरलेले नीतेश राणे यांनी प्रचारयंत्रणेची पद्धतच बदलून टाकली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कासार्डे येथे प्रमोद जठार यांच्या प्रचारार्थ झालेली प्रचारसभा, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही कणकवली येथे झालेली सभा व त्यांनी दिलेले आश्वासन प्रमोद जठार यांना कॅबिनेट मंत्री बनविण्याचे स्वप्न अखेर निरंतरच ठरले आहे. मतदारांपर्यंत जाताना त्यांनी विकास करण्यासाठी मला एकदाच संधी द्या, असे केलेले भावनिक आवाहन, त्यांना प्रचार मोहिमेत मिळालेली कार्यकर्त्यांची चांगली साथ, स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही केलेली मेहनत या जोरावर नीतेश राणे यांनी विजयश्री खेचून आणली. देवगड तालुका हा भाजपचा बालेकिल्ला आहे. गेली ३० वर्षे या बालेकिल्ल्यात भाजपचेच वर्चस्व होते. कणकवली व वैभववाडी तालुक्यातील लोकसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी समोर ठेवल्यावर देवगड तालुक्याने काँग्रेसला मताधिक्य न दिल्याने कणकवली विधानसभा मतदारसंघातही शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आघाडी घेतली.नीतेश राणे यांनी देवगड तालुक्यातून ४१५३ मतांची आघाडी घेतली. यामध्ये किंजवडे जिल्हा परिषद मतदारसंघात ७४२ तर देवगड जिल्हा परिषद मतदारसंघातून ३३ मतांची नाममात्र आघाडी भाजपला घेता आली. उर्वरित सहाही मतदारसंघात नीतेश राणे यांनी घेतलेल्या आघाडीमुळे भाजपचा देवगड तालुक्याला सुरूंग लागला आहे.लोकांची मने जिंकण्यात यश सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देवगड तालुक्यातून युतीचे खासदार विनायक राऊत यांना ३७०० चे मताधिक्य मिळाले होते. पुरळ, पडेल, शिरगाव, देवगड, मिठबाव, किंजवडे या जिल्हा परिषद मतदारसंघातून युतीला मताधिक्य मिळाले होते. तर बापर्डे, फणसगाव, जिल्हा परिषद मतदारसंघातून नीलेश राणे यांना आघाडी मिळाली होती. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये नीतेश राणे यांनी संयमी, अभ्यासू व विश्वासू वृत्तीने निवडणुकीत उतरून देवगड तालुक्यामध्ये सर्व गावांमध्ये दौरे करून लोकांच्या समस्या जाणून लोकांची मने जिंकण्यामध्ये यशस्वी ठरले.
देवगडात काँग्रेसला आघाडी
By admin | Updated: October 23, 2014 00:03 IST