दोडामार्ग : गेल्या काही वर्षांपासून सर्वांनाच डोकेदुखी ठरलेली मोकाट जनावरांची समस्या मार्गी लावण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मोकाट जनावरांवर पायबंद घालण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियमान्वये प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात ‘कलम १६३’ या अस्त्राची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास निश्चितच मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लागू शकतो. संपूर्ण जिल्हाभर विशेषत: तालुका ठिकाणी आणि शहरीकरणाकडे वाटचाल करणाऱ्या सर्वच गावांना अलिकडच्या काही वर्षांत मोकाट जनावरांची समस्या गेल्या काही वर्षांपासून प्रचंड प्रमाणात सतावत आहे. मोकाट जनावरांमुळे जागोजागी वाहतूक कोंडी, वाहन अपघात आणि पादचारी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. त्यामुळे सातत्याने मोकाट जनावरांचा प्रश्न सर्वत्र ऐरणीवर येऊ लागला आहे. नागरिकांना या मोकाट जनावरांच्या उपद्रवाने जेरीस आणले आहे. लोक मोकाट जनावरांचा बंदोवस्त करा, अशी सातत्याने मागणी करीत आहेत. मात्र, एखाददुसरा अपवाद वगळता अद्याप कोणत्याच ठिकाणी या समस्येवर तोडगा काढणे कोणाला शक्य झालेले नाही. मात्र, प्रत्येक ग्रामपंचायतने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतल्यास आणि याप्रश्नी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चा बारकाईने अभ्यास केल्यास या प्रश्नावर उपायकारक उत्तर हमखास मिळते. रस्त्यावर गुरे भटकू देण्याबद्दल किंवा खासगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर त्यांना अपप्रवेश करु देण्याबद्दल हे ‘१६३ कलम’ मोकाट जनावरांवर पायबंद घालण्यासाठी रामबाण उपाय ठरते. वारंवार होणाऱ्या ट्रॅफिक जाममुळे दोडामार्ग बाजारपेठेत अनेक नवनवीन समस्या उद्भवत असताना त्यात भटक्या गुरांची नवी समस्या उभी राहिली आहे. गांधी चौकात तसेच बाजारपेठ परिसरात अनेक भटकी गुरे भररस्त्यातच बैठक मारुन ट्रॅफिक जाम करुन ठेवतात. तसेच मोकाट फिरताना दुकानदारांच्या नकळत त्यांनी बाहेर मांडून ठेवलेले भाजीपाला, केळी तसेच अन्य खाद्य पदार्थ्यांच्या पिशव्या सरळ ओढून नेतात. त्यामुळे व्यापारीवर्गसुद्धा या भटक्या गुरांना कंटाळत आहे. यासाठी दोडामार्ग शहर ग्रामपंचायतीने कलम १६३ अन्वये भटकी गुरे व त्यांचे मालक यावर कडक कार्यवाहीचा बडगा उगारण्याची मागणी होऊ लागली आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम मधील कलम १६३ मधील तरतुदीनुसार खासगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर ज्यांची गुरे मोकाटपणे आढळतील त्यांना पहिल्या अपराधाबद्दल एक महिना मुदतीपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा ३०० रुपये दंड तसेच दुसऱ्यांदा अपराध झाल्यास त्याबद्दल सहा महिने कारावास किंवा ५०० रुपये दंड वसूल करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे. तसेच संबंधित ‘कडक’ कारवाही करण्यास ग्रामपंचायत तयार नसेल तर कलम १६२ अन्वये अशा भटक्या गुरांसाठी कोंडवाडे स्थापून त्यावर रक्षक नेमण्याचे तसेच गुरे नेण्यासाठी आलेल्या गुरांच्या मालकांकडून कोंडवाड्याची फी वगैरे वसूल करण्याचे अधिकार कलम १६४ अन्वये ग्रामपंचायतींना प्राप्त आहेत. इतकेच नव्हे तर कलम १६६ कन्वये मागणी न केलेल्या मोकाट गुरांच्या विक्रीचाही अधिकार ग्रामपंचायतीसाठी राखून ठेवलेला आहे. कोणत्याही गुरास कोंडवाड्यात ठेवल्यावर दहा दिवसांच्या आत कोणत्याही व्यक्तीने अशा गुरांचा मालक म्हणून हजर होऊन ग्रामपंचायतीने आकारलेली कोंडवाड्याची फी व खर्च दिला नाही तर त्या गुरांचा लिलाव करुन ग्रामपंचायत ताबडतोब विक्री करु शकतात. त्यामुळे या ग्रामपंचायतींना शासनाकडून प्राप्त झालेल्या या अधिकाराची वा मोकाट जनावरांवर पायबंद घालणाऱ्या अस्त्राची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांच्या समस्येवर निश्चित तोडगा निघू शकतो.अन्यथा याबाबत कितीही कोणीही आवाज उठविला तरी ही समस्या पूर्णपणे मिटणार नाही. त्यामुळे यात ग्रामपंचायतीने लक्ष देणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)या प्रवृत्तीत बदल व्हावादोडामार्ग शहरात विशेषत: सावंतवाडी येथील राज्यमार्गावर मोकाट गुरांचे ठाण असते. एखाद्या गुराला वाहनचालकाकडून इजा झाली तर मालक समोर येतात. पण तासनतास गुरे मोकाट अवस्थेत असतात. मालकांनी याकडे गांभीर्याने पाहून या वृत्तीत बदल करण्याची मागणी शहरवासीयांतून होत आहे.
भटक्या गुरांच्या पायबंदासाठी ‘कलम १६३’ हाच उपाय
By admin | Updated: October 23, 2014 22:48 IST