मेहरुन नाकाडे-रत्नागिरी -महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत जिल्ह्यातील ८४४ ग्रामपंचायतींपैकी ५४१ ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्या आहेत. तंटामुक्त होण्याचे प्रमाण ६४.९ टक्के इतके आहे. आतापर्यंत केवळ १६ गावांना तंटामुक्त विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. राज्य शासनाने १५ आॅगस्ट २००७ रोजी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले. न्यायालयीन प्रलंबित खटले निकाली काढून गावातील वाद तडजोडीने मिटवून गावात शांतता निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले. या अभियानाच्या माध्यमातून आदर्श समाजनिर्मिती करून गावाची वाटचाल ‘शांततेकडून समृध्दीकडे होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केवळ तंटे मिटविणे नव्हे; तर गावाची वाटचाल शांततेकडून समृध्दीकडे होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानातून जिल्ह्यातील ८५१ ग्रामपंचायतींपैकी ५४१ गावे तंटामुक्त झाली आहेत. २००७-०८मध्ये जिल्ह्यातील एकूण ४८ गावे तंटामुक्त झाली होती. पहिल्याच वर्षी विशेष तंटामुक्त पुरस्कारासाठी राजापूर तालुक्यातील तीन गावांची निवड करण्यात आली. त्यामध्ये कोळवणखडी, परटवली व वाले या गावांचा समावेश आहे. २००८-०९ मध्ये एकूण २४३ गावे तंटामुक्त झाली होती. पैकी ८ गावांची विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. रत्नागिरी शहर पोलीस स्थानक हद्दीतील मिरजोळे, सडामिऱ्या, शिरगाव, फणसोप, कर्ला, तर लांजा तालुक्यातील आंजणारी, राजापूर तालुक्यातील मिळंद व निवेली गावांची निवड करण्यात आली. २००९-१० मध्ये १०४ गावे तंटामुक्त झाली, तर पाच गावांची विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील मजगाव, लांजा तालुक्यातील निवसर, राजापूर तालुक्यातील कणेरी, चिखलगावचा समावेश आहे.२०१०-११ मध्ये ७२ गावे तंटामुक्त झाली. २०११-१२ मध्ये एकूण ५८, २०१२-१३ मध्ये १३ गावे तंटामुक्त, तर २०१३-१४ मध्ये ३ गावे तंटामुक्त झाली. सुरूवातीच्या तीन वर्षात केवळ १६ गावांनी विशेष पुरस्कार मिळविला. परंतु तद्नंतर सलग चार वर्षात एकही गाव विशेष पुरस्काराकरिता पात्र ठरले नाही. गावामध्ये तंटे निर्माण होऊ न देणे, तंट्याचे निराकरण करून ते कमी करणे, सार्वजनिक सण, उत्सव शांततेत साजरे करणे, गावातील सण-उत्सव पोलीस बंदोबस्ताशिवाय शांततेत पार पाडणे, गावात जातीय व धार्मिक सलोखा निर्माण करणे, आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह होत असताना गावागावात जातीय व धार्मिक सलोख्याचे कार्यक्रम घेण्यात येऊन सर्व जाती धर्माच्या लोकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. तंटामुक्त समित्यांच्या कार्याची दखल घेऊन निवड समितीतर्फे पुरस्कारासाठी निवड केली जाते. लोकसंख्येच्या निकषावर तंटामुक्त पुरस्काराची रक्कम अवलंबून आहे. परंतु ज्या गावामध्ये अन्य गावांपेक्षा वेगळे काम केले असेल त्याची दखल घेऊन ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांची विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. संबंधित गावासाठी तंटामुक्त बक्षीस रकमेपेक्षा अधिक २५ हजार रूपये देण्यात येतात. पुरस्काराच्या रकमेतून गावात विकासात्मक कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात तंटामुक्त समितीचे कार्य वेगाने व्हावे, यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांना वेगळी दिशा मिळावी, यासाठी हाती घेतलेल्या अनेक कार्यक्रमांपैकी गावोगाव लोकांनी प्रबोधनाची दिशा हाती घेतली आहे.
जिल्ह्यातील ६४ टक्के गावांनी घेतला तंटामुक्तीचा श्वास
By admin | Updated: January 9, 2015 00:13 IST