निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर पर्यावरण व वातावरणीय विभाग कार्य करीत असतात. पृथ्वी तत्वाशी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धूपीकरण इत्यादी बाबींवर कार्य करणे. वायूचे संरक्षण करताना हवेच्या गुणवत्तेसाठी वायू प्रदूषण कमी करणे, जल विभागात नदी संवर्धन, सागरी जैव विविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण, सागरी किनारे स्वच्छता ठेवणे. अग्नीसाठी ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा-पडीक जमिनी, शेतीचे बांध येथे अपारंपरिक ऊर्जा वापरासाठी प्रयत्न करणे. आकाश विभागात काम करताना स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करून मानवी स्वभावातील बदलासाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे बिंबविणे हा प्रमुख उद्देश आहे.
निसर्गाची ही पंचतत्वे अंगिकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकत नाही. जैवविविधतेचे अस्तित्व राहणार नसल्याने ‘माझी वसुंधरा’ हे अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राबविण्यात येत आहे. महाबळेश्वर पालिकेनेही या अभियानामध्ये सहभाग घेतला आहे. शहरातील रांजणवाडी शाळेमध्ये नववर्षाच्या प्रारंभी ‘माझी वसुंधरा शपथ’ घेऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये शहरातील महिला बचतगट, वस्तीस्तरीय संघातील महिलांनी वसुंधरा संवर्धनासाठीची शपथ घेतली.
मुख्याधिकारी पल्लवी पाटील म्हणाल्या, ‘माझी वसुंधरा हे अभियान शहरात विविध उपक्रमांनी प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. ते यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहभागी होत आपले योगदान द्यावे.’
यावेळी नगरसेवक कुमार शिंदे,पालिकेचे संतोष धड,किरण ढेबे पालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.