सातारा : कास पाणीपुरवठा योजनेच्या बंदिस्त जलवाहिनीला गळती लागली आहे. पालिकेकडून गळती काढण्याचे काम बुधवार, दि. ६ रोजी हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी व गुरुवारी सकाळ सत्रातील पाणीपुरवठा कमी दाबाने होईल अथवा पूर्णपणे बंद राहील, अशी माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली.
सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला कासाणी गावाजवळ दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पाणीपुरवठा विभागाकडून गळती काढण्याचे काम बुधवारी हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी आठ तासांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे कास योजनेतून बुधवारी सायंकाळी व गुरुवारी सकाळच्या सत्रात होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल अथवा होणार नाही. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर व मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.